पवनराजे हत्याकांडाच्या निकालानंतर अनिल देसाईंचं मोठं विधान:ओमराजेंचा विश्वासघात झाला, परत यायचं असेल तर उद्धव ठाकरे निर्णय घेतील

पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. या निकालानंतर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार अनिल देसाई यांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याबाबत महत्त्वपूर्ण विधान करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. “ओमराजे निंबाळकर यांचा विश्वासघात झाला आहे. त्यांना पुन्हा आमच्यासोबत यायचं असेल तर त्याबाबतचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील,” असे देसाई यांनी स्पष्ट केले. पवनराजे प्रकरणातील निकालानंतर प्रतिक्रिया २० वर्षांपासून चर्चेत असलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडात विशेष सीबीआय न्यायालयाने माफीच्या साक्षीदाराची साक्ष अविश्वसनीय ठरवत सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने आपल्या निकालात माफीच्या साक्षीदाराने वारंवार जबाब बदलल्यामुळे त्याच्या साक्षीवर विश्वास ठेवता येत नसल्याचे नमूद केले. त्यामुळे संशयाचा फायदा देत सर्व आरोपींची मुक्तता करण्यात आली. निकालानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अनिल देसाई म्हणाले की, “ओमराजे निंबाळकर यांच्या आयुष्यातील हा सर्वात मोठा संघर्ष होता. वडिलांच्या हत्येनंतर तब्बल दोन दशके त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यांना काही आश्वासने देण्यात आली होती, काही गोष्टी घडतील असा त्यांचा ठाम विश्वास होता. मात्र, आजच्या निकालानंतर त्यांचा तो विश्वास तुटल्याचे दिसत आहे.” “२० वर्षांच्या संघर्षानंतर ओमराजेंच्या पदरी निराशा” देसाई म्हणाले की, पवनराजे हत्याकांड हा केवळ न्यायालयीन खटला नव्हता, तर ओमराजे निंबाळकर यांच्या वैयक्तिक आयुष्यातील सर्वात मोठा लढा होता. “२० वर्षे त्यांनी न्यायासाठी संघर्ष केला. सुनावण्या, पुरावे, न्यायालयीन प्रक्रिया या सर्व टप्प्यांत ते सक्रिय राहिले. मात्र आता निकाल त्यांच्या अपेक्षेप्रमाणे लागला नसल्याने त्यांच्या पदरी मोठी निराशा आली आहे,” असे देसाई म्हणाले. पक्षशिस्तीचा भंग केल्याची आठवण ओमराजे निंबाळकर यांनी अलीकडेच ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे झुकल्याची चर्चा सुरू असताना अनिल देसाई यांनी त्यांच्यावर पक्षशिस्त मोडल्याचाही आरोप केला. “शिवसेनेची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली होती. त्या बैठकीला ओमराजे उपस्थित राहिले नाहीत. त्यांनी पक्षाच्या व्हीपकडे आणि शिस्तीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केला आहे,” असे देसाई म्हणाले. तथापि, त्यांनी दार पूर्णपणे बंद नसल्याचे संकेत देत म्हटले की, “जर आता ते पुन्हा आमच्यासोबत राहण्याचा विचार करत असतील, तर त्याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे.” ‘ऑपरेशन टायगर’च्या पार्श्वभूमीवर चर्चांना उधाण ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात जाण्याच्या हालचालींमुळे राज्यात ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू आहे. या सहा खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचेही नाव असल्याने त्यांच्याकडे विशेष लक्ष लागले आहे. अशातच पवनराजे हत्याकांडाचा निकाल लागल्याने आणि त्यानंतर अनिल देसाई यांनी केलेल्या वक्तव्यामुळे ओमराजे पुन्हा ठाकरे गटात परतणार का, याबाबत नव्या राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. अमित शाह यांच्या विधानालाही प्रत्युत्तर यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या शिवसेनेबाबतच्या वक्तव्यावरही अनिल देसाई यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “जर शिंदे गटालाच शिवसेना म्हटले जात असेल, तर सर्वोच्च न्यायालयात अजूनही शिवसेना आणि पक्षचिन्हाबाबतची सुनावणी सुरू आहे, हे लक्षात घ्यायला हवे. अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. खरी शिवसेना कोण आणि गट कोण, हे न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्ट होईल.” पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालामुळे आधीच चर्चेत असलेल्या ओमराजे निंबाळकर यांच्याभोवतीचे राजकीय गणित आणखी गुंतागुंतीचे झाले आहे. आता त्यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या वाचा… पवनराजे हत्याकांडातील सीबीआय कोर्टाचे 10 सर्वात मोठे खुलासे:माफीचा साक्षीदार अविश्वसनीय, मोबाईलचे सीडीआर गायब, अन् पोलिसांच्या घोडचुका महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या बहुचर्चित पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर २० वर्षांनंतर निकाल लागला आहे. सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांनी माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आठ आरोपींची संशयाचा फायदा देत निर्दोष मुक्तता केली आहे. सीबीआय (CBI) कोर्टाने आपला ऐतिहासिक निकाल देताना तपास यंत्रणा, पोलीस आणि सीबीआयच्या अत्यंत ढिसाळ कारभारावर प्रचंड कडक शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या खटल्याचा संपूर्ण पाया ज्या ‘माफीच्या साक्षीदारावर’ उभा होता, त्यालाच न्यायालयाने अविश्वसनीय आणि सोयीनुसार खोटे बोलणारा ठरवले आहे. खासदार ओमराजे निंबाळकर आणि त्यांच्या कुटुंबासाठी हा एक मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या कोर्ट क्रमांक ५५ मध्ये पार पडलेल्या या सुनावणीतील १० सर्वात मोठे खुलासे आणि कोर्टाची सविस्तर निरीक्षणे येथे वाचा संपूर्ण बातमी पवनराजे हत्याकांडाचा 20 वर्षांनंतर निकाल:पुराव्याअभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता; ओमराजे म्हणाले- निकाल दुर्दैवी, आता हायकोर्टात दाद मागणार राज्यातील बहुचर्चित आणि तब्बल 20 वर्षांपासून न्यायालयात प्रलंबित असलेल्या पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि राज्याचे माजी गृहमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्वच्या सर्व आरोपींची न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायालयाने दिलेल्या या धक्कादायक निकालामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून, निंबाळकर कुटुंबासाठी हा फार मोठा धक्का मानला जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी ऑपरेशन टायगर संकटात:ओमराजे म्हणाले – शिंदेसेनेत जाण्याचा निर्णय अजून नाही, मतदारसंघात जावून चर्चा करून पुढचे ठरवणार! ‘पवनराजे हत्याकांडाच्या निकालाविरोधात हायकोर्टात जाणार आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाण्याचा कोणातही निर्णय घेतलेला नाही. मतदारसंघात जावून मतदारांशी चर्चा करेन, त्यानंतर निर्णय घेईन,’ अशी प्रतिक्रिया ओमराजे निंबाळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरचे भवितव्य आता ओमराजे निंबाळकर यांच्या हाती आहे. तूर्तास तरी ऑपरेशन टायगर संकटात आल्याचे बोलले जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी

Leave a Comment

error: Content is protected !!