मालमत्तेवरून वाद:कोर्टाच्या निकालानंतर वडिलांनी घराचा ताबा घेतला अन् मुलाने रस्त्यातच त्यांना संपवले, संभाजीनगरमध्ये रात्री घडलेला थरार

घराच्या मालकीचा निकाल वडिलांच्या बाजूने लागला. त्यानुसार गुरुवारी (११ जून) तहसीलदार व सातारा पोलिसांच्या समक्ष ताबा दिला. तेथून परत येत असताना मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह मुलाने रिक्षा अडवून वडिलांवर चाकूने वार केले. या हल्ल्यात जाफर कमरुद्दीन सय्यद पटेल (८२, रा. सध्या पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांची मुलगी जखमी झाली. आरोपी अब्दुल रहेमान अब्दुल जाफर (४५, रा. सिल्कमिल कॉलनी) यास ताब्यात घेतल्याची माहिती निरीक्षक कृष्णा शिंदे यांनी दिली. रात्री नऊच्या सुमारास सिल्कमिल्क कॉलनीत हा थरारक प्रकार घडला. जाफर पटेल आणि त्यांचा मुलगा अब्दुल रहेमान यांच्यात घराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू होता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नुकताच निकाल वडिलांच्या बाजूने लागला होता. या निकालानुसार, वादग्रस्त घराचा ताबा घेण्यासाठी पुणे येथून जाफर पटेल आणि त्यांची मुलगी शहरात आले होते. रात्री साठेआठच्या सुमारास घराची पाहणी करून पटेल घरी परतत असताना त्यांच्यावर व मुलीवर आरोपीने जीवघेणा हल्ला केला. वडिलांवर ८, बहिणीवर ५ वार आरोपीने चाकूने वडिलांच्या गळ्यावर, पोटावर, छातीत आणि हातावर तब्बल ८ वार केले. तर, जखमी बहिणीच्या तोंडावर आणि गळ्यावर ५ वार केले. तिच्यावर घाटीत उपचार सुरू असून तिला १५ ते २० टाके पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. कुलूप बघायला गेले अन् घात झाला पटेल यांना घराचा ताबा मिळत असताना आरोपीने तेथे गोंधळ घातला. ताबा घेतल्यानंतर सर्व जण परत निघाले. त्या वेळी मुलाने कुलूप तोडले असेल, असे म्हणत वडील पुन्हा तपासणीसाठी गेले. कुलूप व्यवस्थित असल्याची खात्री करून परतताना आरोपीने त्यांना गाठले व चाकूने वार करून वडिलांना ठार केले. आरोपी मेहुण्याच्या घरी लपला आरोपी रहेमान पळून गेल्याची माहिती मिळताच छावणी ठाण्याचे सहायक निरीक्षक विवेक जाधव, सातारा ठाण्याचे नंदकुमार भंडारे आदींच्या पथकाने रात्री त्यास मिटमिटा येथील मेहुण्याच्या घरातून ताब्यात घेतले. झोपेच्या गोळ्या खाल्ल्याने तो नशेत असल्याचा संशय आहे. त्याला तपासणीसाठी घाटी रुग्णालयात नेले आहे. त्रासामुळे कंटाळून मुलीकडे वास्तव्य अबरार कॉलनी येथे पटेल यांच्या कुटुंबातील दोन्ही मुले व वडील एकत्र राहत होते. ते जलसंपदा विभागातून निवृत्त झाले होते. आरोपी मुलगा सातत्याने घरातील सदस्यांशी वाद घालायचा. त्याच्यावर पहिल्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर त्याने दुसरा विवाह केला. मात्र तोही संसार व्यवस्थित सुरू होता. काही वेळा त्याने वडिलांना मारहाणही केली. त्यामुळे बहिणीने वडिलांना आपल्याकडे पुण्याला राहण्यासाठी नेले होते. त्यानंतर शिक्षित वडिलांनी कायदेशीर लढाईचा मार्ग अवलंबला. २ वर्षांनी न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानुसार गुरुवारी घर त्यांच्या ताब्यात आले होते.

Leave a Comment

error: Content is protected !!