बातमी ऐका (Marathi Voice Reader)
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना दावा केला की, एकनाथ शिंदे यांचा पक्ष भाजपच्या ‘ऑपरेशन थिएटर टेबल’वर आला आहे. देवेंद्र फडणवीस कधी त्यांचे ‘ऑपरेशन’ करतील, हे त्यांना समजणारही नाही, असे राऊत म्हणाले. संजय राऊत पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात लढायचे असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवे. मोदींनंतर दुसरे पंतप्रधान निर्माण होऊ शकत नाहीत हा भ्रम आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून विकृती वाढली असून, भाजप जात-धर्मात वाद निर्माण करून दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. उबाठा खासदारांची बैठक संजय राऊत म्हणाले की, पंतप्रधान मोदी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना घाबरत असल्याचे सध्या दिसत आहे, राहुल गांधी राजकारणात प्रामाणिकपणे काम करत लोकांचे मुद्दे मांडत आहेत. मुंबईत मातोश्रीवर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नऊ खासदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदारांशी चर्चा करून त्यांच्या मतदारसंघातील विविध प्रश्नांवर माहिती घेणार आहेत.
शहांनी 100 वेळा ऑपरेशन केले संजय राऊत म्हणाले की, एखाद्या पक्षात लोकप्रतिनिधींची बैठक घेणे हा नियमित कार्यक्रम असतो. त्यामुळे ‘ऑपरेशन’च्या ज्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, त्या खोट्या आहेत. ‘ऑपरेशन टायगर’ म्हणणाऱ्यांचे अमित शहा यांनी 100 वेळा ‘ऑपरेशन’ केले आहे. त्यामुळे हे ‘ऑपरेशन टायगर’ काय आहे, हे आम्हाला माहीत नाही. 50-50 लाख रुपये नेमके कुठून येतात? संजय राऊत म्हणाले की, आमच्या पक्षातून कोणीही फुटणार नाही, मात्र पक्ष फोडणे हा भाजपचा एककल्ली कार्यक्रम आहे. पक्ष फोडण्यासाठी 50-50 लाख रुपये नेमके कुठून येतात, याचे उत्तर भाजपने दिले पाहिजे. पक्ष फोडणे, माणसे फोडणे ही विकृत घटना आहे. निवडणूक आयोग भाजपचा एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजप हे बुडायला लागलेले जहाज संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचा लढा, मराठीचा लढा, हिंदुत्वाचा लढा, अयोध्या नंतर दंगलीच्या घटनांमध्ये भाजप कुठेच दिसत नव्हता. भाजप हे बुडायला लागलेले जहाज असून, ते कधी बुडेल हे सांगता येत नाही. सीबीआय, ईडी, आयकर विभाग यांना हाताशी धरून लोकांवर दबाव निर्माण करण्याचे काम भाजपने केले आहे, असे राऊत यांनी नमूद केले.