पत्नी व दोन मुलांना अन्न पदार्थातून विष घालून स्वत गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या शिक्षक योगेश पाटील (रा.हात्तीद,ता.बार्शी) याच्या सुसाईड नोटवरुन त्याने हे का केले? याचे ठोस कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत. दरम्यान कोरिजेनच्या विष बाधेतून तिघांचा मृत्यू झाला असेल तर निपचित पडलेल्या अवस्थेत पत्नी, दोन्ही मुले कशी ? असा प्रश्न तपासात समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांना सापडलेल्या आइस्क्रीमचा डब्बा आऊट डेट असलेला असल्याचे सांगितले जात असून विष प्राशन केल्यानंतर कोणासही उलटी, मळमळ अशी लक्षणे दिसलेली नाहीत. वैद्यकीय विभागाने मृत्यूच्या कारण शोधण्यासाठी व्हिसेरा राखून ठेवला आहे. हत्तीज येथील प्रभारी मुख्याध्यापक योगेश पाटील याच्यासह पत्नी व दोन मुलांच्या मृत्यूच्या हृदयद्रावक प्रकरणात तपासाला नवे वळण मिळत आहे. प्राथमिक तपासात शेअर ट्रेडिंगमधील मोठ्या आर्थिक नुकसानीचा धागा समोर असला तरी आर्थिक तणाव आणि कर्जबाजारीपणा हे घटनेमागील प्रमुख कारण आहे काय? हे पोलिसांकडून तपासले जात आहे. सुरुवातीच्या काळात शेअर मार्केटमधील नुकसानीनंतर परिस्थिती सावरण्यासाठी योगेश याने नातेवाईक, मित्रपरिवार आणि परिचितांकडून हात उसने पैसे घेतल्याची बाबही तपासात पुढे आली आहे. त्यामुळे आर्थिक संकटाचा मानसिक परिणाम या घटनेमागे कारणीभूत ठरला असावा, अशी शक्यता तपास यंत्रणा पडताळून पाहत आहे. . योगेश याने पत्नी मधुरी व स्वतःच्या नावे शेअर मार्केटचे खाते उघडून तो स्वतः वापरत होता. त्यातील फायदा – तोटा पत्नीला सांगत नव्हता. २०२४ पासून शेअर बाजारात नुकसान होण्यास सुरुवात झाली. सुसाईड नोटमध्ये सुमारे १५ लाख उसने घेतलेल्या लोकांची नावे लिहून ठेवलेली आहेत. . एका ट्रेडमध्ये सुमारे ४० ते ५० लाखाची केलेली गुंतवणूक बुडाली. त्यामुळे तो खूपच नैराश्यात गेला. काही महिन्यापूर्वी त्याने एसबीआय बँकेचा अपघाती विमा काढण्याचा प्रयत्न केला. बँकेने मागितलेल्या वैद्यकीय अहवालात किडनीच्या गंभीर आजाराचे निदान झाल्याने बँकेने विमा नामंजूर केला. . विमा काढण्याची संधी स्टेट बँकेची मिळाली असती तर आपण आत्महत्या केल्यानंतर विमा क्लेम मिळेल. त्याच्यातून लोकांची देणी देता येतील व कुटुंबाला आर्थिक मदत होईल आणि याचाही विचार केल्याचे सुसाईड मध्ये नमूद केले आहे. . अनेक व्यक्ती शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आर्थिक प्रगतीची संधी म्हणून पाहतात. परंतु अचानक मोठे नुकसान झाल्यास तीव्र ताण, चिंता, अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते. यातूनच टोकाचा निर्णय घेण्याचा धोका वाढतो. . आर्थिक नुकसान हे आत्महत्येचे एकमेव कारण नसते. नैराश्याचा त्रास, भावनिक आधाराचा अभाव, सामाजिक एकाकीपणा, झोपेच्या समस्या, चिंता विकार किंवा मानसिक आरोग्याविषयी जागरूकतेची कमतरता हे घटकही महत्त्वाची असतात. . समाजाने अथवा कुटुंबीयांनी आर्थिक अपयशावरुन व्यक्तीचे मूल्यांकन करु नये. आर्थिक संकटाच्या काळात कुटुंबीय, मित्र आणि सहकारी यांच्याशी संवाद वाढवावा. आवश्यकता असल्यास मानसोपचारतज्ज्ञ किंवा समुपदेशकाची मदत घेण्यास प्रोत्साहन द्यावे. – डॉ. संतोष बिनवाडे, मानसोपचार तज्ञ, बार्शी. केवळ आर्थिक नुकसान आत्महत्येचे कारण नसते, नैराश्याचा त्रास शवविच्छेदनाचा अहवाल सोमवारपर्यंत मिळणार चारही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याचा प्राथमिक अहवाल सोमवारी वैराग पोलिसांना प्राप्त होण्याची शक्यता आहे. तसेच मृतांच्या अंतर्गत अवयवांचे (व्हिसेरा) नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून त्याच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण अधिक स्पष्ट होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल बोपलकर यांनी सांगितले आहे. सध्या पोलिसांकडून आर्थिक व्यवहार, मोबाईल डेटा, २६ पानी पत्रातील मजकूर आणि इतर पुराव्यांच्या आधारे घटनेमागील सत्य उलगडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
