गणेश नाईक कद्रू मनाचे अन् अल्पसंतुष्ट, ते भाजपचे निष्ठावंत नाहीत:एक दिवस नवी मुंबईच्या राजकारणातून संपतील- शहाजीबापू पाटील

नवी मुंबईतील एका शासकीय कार्यक्रमाच्या पत्रिकेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्यामुळे शिवसेना नेते कमालीचे आक्रमक झाले आहेत. शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांनी भाजप आमदार गणेश नाईक यांच्यावर शेलक्या शब्दांत घणाघाती टीका केली आहे. गणेश नाईक हे कद्रू मनाचे आणि अल्पसंतुष्ट माणूस आहेत, असा टोला लगावतानाच त्यांनी नाईकांना त्यांच्या भूतकाळातील राजकारणाची आठवण करून दिली. शहाजीबापू पाटील म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येक जिल्ह्यातील शासकीय कार्यक्रमात पालकमंत्र्यांचे किंवा मुख्यमंत्र्यांचे नाव असण्याची साधनसुचिता पाळलीच पाहिजे. ‘मी आणि माझी नवी मुंबई, मी इथला राजा’ ही नाईकांची भावना लोकशाहीत चालणार नाही. एक दिवस गणेश नाईक हे नवी मुंबईच्या राजकारणातून पूर्णपणे संपलेले दिसतील. 1997 मध्ये मनोहर जोशी यांचे युती सरकार पाडण्यासाठी त्यांनी शरद पवारांशी संपर्क साधला होता, असा गंभीर आरोपही बापूंनी केला.

उबाठा गुवाहाटीच्या धक्क्यातून सावरलेली नाही शहाजीबापू पाटील म्हणाले की, तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी पक्षांतराचा निर्णय दिल्लीत घेतला आहे. त्यामुळे मुंबईत नारळाच्या झाडाखाली बसून काल्पनिक विधाने करणे राऊतांनी बंद करावे. औरंगजेबाला जिकडे-तिकडे संताजी आणि धनाजी दिसायचे, तशीच अवस्था आता उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची झाली असून त्यांना स्वप्नातही फक्त एकनाथ शिंदेच दिसत आहेत. हे नेते अजूनही गुवाहाटीच्या धक्क्यातून सावरलेले नाहीत; परंतु येत्या काही दिवसांत संपूर्ण ‘उबाठा’ पक्ष एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात आल्याशिवाय राहणार नाही. सोलापुरात महायुतीचाच विजय होणार शहाजीबापू पाटील म्हणाले की, मोहिते-पाटलांचे राजकारण आता पूर्णपणे विरघळले असून त्यात कोणताही दम उरलेला नाही. तर वसंत देशमुख हे साधे-सरळ माणूस असून त्यांनी या राजकीय भानगडीत पडायला नको होते. सोलापूर विधान परिषद निवडणुकीत महायुती आणि त्यांचे छुपे मित्र एकत्र येऊन राजेंद्र राऊत यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास शहाजीबापूंनी व्यक्त केला आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!