चालू वर्षी जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात माढा तालुक्यासह उजनी धरणाच्या लाभक्षेत्रात अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. अपवाद वगळता बहुतांश भाग कोरडाच राहिल्याने खरीप हंगामाची सुरुवात रखडली आहे. यंदा अल निनोच्या परिणामामुळे पाऊस कमी राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. दरम्यान, उजनी धरणातील पाणीसाठ्यातही लक्षणीय घट झाली आहे. १४ जून २०२६ रोजी धरणातील एकूण पाणीसाठा ५०.९५ टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा केवळ १२.६१ टीएमसी आहे. धरणाची उपयुक्त पाणीपातळी उणे २३.७२ टक्क्यांवर पोहोचली आहे. याउलट १४ जून २०२५ रोजी उजनी धरणात ८५.४८ टीएमसी एकूण पाणीसाठा, २१.८३ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आणि ४०.७४ टक्के पाणी उपलब्ध होते. म्हणजेच यंदा मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ३५ टीएमसीने कमी पाणीसाठा शिल्लक आहे. खरीप पेरण्यांसाठी शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे भविष्यात पिण्याचे पाणी, शेतीसाठी सिंचन तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून, लाभक्षेत्रातील शेतकरी चिंतेच्या छायेत आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. उजनी धरणची पावसाळ्या पूर्वीच्या कामांना वेग धरणाच्या भिंती, गेट्स आणि यंत्रणांची तपासणी व दुरुस्ती. सर्व दरवाजे (गेट्स) उघडणे-बंद करणे याची चाचणी. गंजलेले भाग रंगकाम व ऑइलिंग करून कार्यक्षम ठेवणे. सांडवा (स्पिलवे) परिसरातील गाळ, झाडे-झुडपे हटविणे. कालवे, बोगदे आणि पाणी सोडण्याच्या मार्गांची स्वच्छता. धरण परिसरातील विद्युत यंत्रणा व जनरेटर तपासणी. पावसाचे मोजमाप करणारी उपकरणे व नियंत्रण प्रणाली कार्यरत ठेवणे. आपत्कालीन पूर नियोजन व बचाव पथकांची तयारी. धरणा खालील गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यासाठी यंत्रणा तयार ठेवणे. पाणी साठ्याचा अंदाज घेऊन आवर्तन आणि विसर्ग नियोजन. धरण परिसरातील सुरक्षा भिंती, रस्ते आणि प्रकाश व्यवस्था दुरुस्ती