Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

राज्यात लॉकडाऊन लागणार नाही:अफवा पसरवणाऱ्यांवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशात निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट् केले आहे. केंद्राने सद्यस्थितीवर भाष्य करताना लॉकडाऊन लागणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे जे लोक अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. या प्रकरणी खोटी माहिती फेसबुक, एक्स किंवा इतर कोणत्याही समाज माध्यमावर टाकली किंवा व्हॉट्सएपच्या माध्यमातून फॉरवर्ड केली तरी तो गुन्हा ठरेल, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी नरहरी झिरवाळ व अशोक खरात प्रकरणातही चौकशी अंती ठोस कारवाई करण्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी काही वेळापूर्वी माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी पेट्रोल – डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज्यातील वेगवेगळ्या प्रश्नांवर भाष्य केले. ते म्हणाले, आखाती देशांतील युद्धामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहे. यामुळे पेट्रोल – डिझेलचे दर वाढण्याची शक्यता होती. पण इंधन दरवाढीचा फटका सामान्य ग्राहकांना बसू नये म्हणून पेट्रोल – डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपयांनी कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता कच्च्या तेलाच्या वाढलेल्या भावाचा परिणाम सरकारी तेल कंपन्या व भारत सरकार सहन करणार आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना आता अधिकच्या दरात पेट्रोल – डिझेल घ्यावे लागणार नाही. मी याविषयी भारत सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. विशेषतः ज्यावेळी आपल्या आजूबाजूंच्या देशांमध्ये जवळपास शटडाऊनची स्थिती ओढावली आहे. पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आदी देशांतील लोकांनी गॅस व पेट्रोलच्या तुटवड्यामुळे जवळपास कार्यालये व संस्था बंद केल्या आहेत. अशावेळी भारताने अतिशय उत्तम मॅनेजमेंट करून आपल्याकडे पेट्रोल-डिझेलची कोणताही तुटवडा होऊ दिला नाही. घरगुती गॅसची कोणतीही कमतरता होऊ दिली नाही. पेट्रोल पंपांवर रांगा लावण्याची गरज नाही मी सर्व लोकांना विनंती करतो की, विनाकारण अफवेच्या आधारावर पेट्रोल – पंपांवर रांगा लावू नका. आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल – डिझेलचा पूर्ण स्टॉक आहे. पण विनाकारण रांगा लावून जास्तीचे पेट्रोल-डिझेल भरून घेतले तर त्यातून मागणी व पुरवठ्यावर ताण निर्माण होतो. कृत्रिम टंचाई निर्माण होते. अशा प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून आपण नेहमी ज्या पद्धतीने पेट्रोल-डिझेल भरतो, तसेच पेट्रोल – डिझेल ग्राहकांनी भरावे, असे फडणवीस म्हणाले. केंद्राने लॉकडाऊन लागणार नाही हे जाहीर केले आहे. जे लोक अशी अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. अशा पद्धतीची खोटी माहिती फेसबुक, एक्स किंवा इतर कोणत्याही समाज माध्यमावर टाकणे किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सएपच्या माध्यमातून पुढे पाठवली तरी तो गुन्हा ठरेल. अशा गुन्ह्यांतील प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे मी सर्वांना स्पष्टपणे सांगतोय की, खोट्या अफवा पसरवू नका, नाही तर फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. नरहरी झिरवाळांनी संपर्क साधून स्थिती स्पष्ट केली मुख्यमंत्र्यांनी यावेळी मंत्री नरहरी झिरवाळांच्या व्हायरल व्हिडिओवरही भाष्य केले. नरहरी झिरवळ यांनी माझ्याशी फोनवरून संपर्क साधून हा व्हिडिओ 3-4 व्हिडिओ जोडून चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात आल्याचे सांगितले आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे. मी त्यांना सल्ला दिला आहे की, त्यांनी तत्काळ त्या संदर्भात एक तक्रार दाखल करावी. या व्हिडिओची शहानिशा केली जाईल. एकूण उद्भवलेल्या परिस्थितीची सत्यता पडताळून त्यांच्या पक्षाच्या नेत्या सुनेत्राताई पवार व आम्ही योग्य तो निर्णय करू. मागच्या काळात जी घटना घडली त्याचे पूर्ण चौकशी झाली. त्याचा संबंध झिरवळापर्यंत आढळला नाही. पण आत्ता जी घटना घडली आहे, जे काही व्हिडिओ समोर आलेत. ते गंभीर आहेत. त्यामुळे त्याची सत्यता पडताळणे अत्यंत गरजेचे आहे. ते जर सत्य असेल तर त्यावर योग्य ती कारवाई होईलच, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी भोंदू अशोक खरात प्रकरणातही व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला. भोंदू अशोक खरातचे कुणासोबत फोटो किंवा व्हिडिओ येतात त्यावरून कोणताही निष्कर्ष काढता येत नाही. त्यातील व्यक्तीचा प्रत्यक्ष सहभाग आहे का? हे महत्त्वाचे आहे. त्यात कुणाचा सहभाग असेल तर कारवाई होईल. नसेल तर केवळ फोटो आहे म्हणून कारवाई होणार नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे की, या प्रकरणात कुणालाही सोडण्याचे कारण नाही. सरकार अतिशय खोलवर जात आहे. अनेक नव्या गोष्टी पुढे येत आहेत. व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर होणार कारवाई अजून काही एफआयआर होण्याची शक्यता आहे. काही पीडित अजून पुढे येत आहेत. काही महिला पुढे येत आहेत. आर्थिक फसवणूक झालेल्या व्यक्तीही पुढे येत आहेत. त्यांचेही एफआयआर लवकरच पाहायला मिळतील. या प्रकरणातील पीडित महिलांचे व्हिडिओ काही लोकांनी सोशल मीडिया साईटवर अपलोड केलेत. ते आम्ही काढून टाकलेत. पण ज्या – ज्या लोकांनी हे व्हिडिओ सोशल मीडिया साईटवर अपलोड केलेत, त्यांच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल. पीडितांना पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. यापुढेही ज्या महिला पुढे येतील त्यांना संरक्षण दिले जाईल. हे संरक्षण गोपनियतेचे आहे. काही जण ही गोपनियता भंग करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल, असे फडणवीस म्हणाले. संजय राऊतांच्या पक्षाकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सुंदोपसुंदी विशेषतः आदित्य ठाकरे व संजय राऊत यांच्यातील कथित वादावरही भाष्य केले. संजय राऊत यांचा पक्ष आता एवढा छोटा झाला आहे की, तिथे काय चालते त्याकडे लक्ष देण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही. त्यामुळे ते आपसात भांडो, मारामाऱ्या करो, एकमेकांच्या झिंज्या उपटो, एकमेकांचे कॉलर पकडो, त्यांचे त्यांना लखलाभ. आम्हाला महाराष्ट्र चालवायचा आहे, असे ते म्हणाले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!