सर्वच बँकांचे पीककर्ज होणार माफ:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही, आतापर्यंतची सर्वात चांगली कर्जमाफी असल्याचा दावा

ज्या बँकांना पीक कर्ज देण्याचा अधिकार आहे, त्या बँकांतून पीक कर्ज घेतलेल्या सर्वच शेतकऱ्यांना सरकारच्या 2 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. यामुळे सरकारच्या कर्जमाफीचा लाभ कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? याविषयीची संभ्रमावस्था संपुष्टात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. त्यात त्यांनी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. पण या कर्जमाफीचा लाभ कोणत्या बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जावर मिळेल याविषयी वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात होते. पण आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः याविषयीची स्थिती स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, मी शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. त्यामुळे त्याबद्दल कुणाच्याही मनात संभ्रम नाही. काही लोक वेगवेगळ्या गोष्टी पसरवण्याचा प्रयत्न करतात. कुणी म्हणतो राष्ट्रीयीकृत बँकांचे कर्ज माफ होणार नाही, कुणी म्हणतो जिल्हा बँकेचे होणार नाही, कुणी म्हणतो या सोसायटीची होणार नाही, कुणी म्हणतो त्या सोसायटीची होणार नाही. पण सरकारने पीक कर्ज देण्याचा अधिकार असणाऱ्या कोणत्याही बँकेने दिलेले 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ आमचा प्रयत्न हा आहे की, माफी शेतकऱ्याला द्यायची आहे बँकेला नाही. त्यामुळे या निर्णयाचा फायदा शेतकऱ्याला व्हावा यासाठी काम सुरू आहे. आम्ही यापूर्वीच सांगितले आहे की, 30 जूनच्या आधी आपण कर्जमाफी करणार आहोत. त्यामुळे आता ही घोषणा बजेटमध्ये करण्यात आल्यामुळे पुढच्या कारवाईला सुरुवात होईल. समिती यावर काम करत आहे. ही समिती यासंबंधीच्या सगळ्या गोष्टी सांगेल. मी एवढेच सांगतो की, ही कर्जमाफी यापूर्वीच्या सर्वच कर्जमाफीच्या निर्णयांहून चांगली आहे. वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर मुख्यमंत्र्यांनी यावेळी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भासाठी गेमचेंजर ठरणार असल्याचाही दावा केला. कालच्या अर्थसंकल्पात संपूर्ण महाराष्ट्राला भरभरून मिळाले आहे. जेव्हा महाराष्ट्राला भरभरून मिळते, तेव्हा विदर्भ कसा मागे राहील. विदर्भासाठी वैनगंगा – नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भासाठी गेम चेंजर ठरेल. हा प्रकल्प आतापर्यंतच्या आपल्या इतिहासातील सगळ्यात मोठा नदीजोड प्रकल्प आहे. त्याला प्रशासकीय मान्यता देऊन त्याचा आपण अर्थसंकल्पात समावेश केला आहे. त्यामुळे विदर्भाचे चित्र पूर्णपणे बदलेल, असे ते म्हणाले. इराण युद्धावर भीतीचे वातावरण तयार करू नका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी माध्यमांना इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धावर नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होईल असे चित्र निर्माण न करण्याचेही आवाहन केले. माझी माध्यमांना विनंती आहे की, नागरिकांमध्ये विनाकारण भीतीचे वातावरण करू नये. जी काही परिस्थिती आहे, ती केंद्र सरकार हाताळत आहे. ती केंद्र सरकार सांगत आहे. विनाकारण वेगवेगळ्या बातम्या दाखवून हे घडणार, ते घडणार असे सांगून नागरिकांच्या मनात भीती व संभ्रम तयार करणे हे देशाच्या व समाजाच्या नाही. केंद्र सरकारनेही काल हेच स्पष्टपणे सांगितले आहे, असे ते म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!