तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एकाच समाजातील २५ वर्षीय तरुणाचा त्याच्या प्रेयसीचे २ भाऊ आणि मेव्हण्याने सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास तीक्ष्ण हत्याराने छातीवर वार करत खून केला. या वेळी तिन्ही भावांना गावातील नागरिकांनी चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर संशयित आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी कळवण उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले असता संतप्त नातेवाइकांनी आरोपींवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली व आरोपींना सुरक्षितपणे पोलिस ठाण्यात हलवले. या ठिकाणी दोन पोलिस जखमी झाले. नरुळ येथील मृत सचिन मोतीराम चौरे (२५) याचे ८ वर्षांपासून आठंबे येथील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. हट्टापुढे कुटुंबीयांचे नमते सोबत आयुष्य जगायचे असल्याने तरुणीने सचिनसोबत लग्न करण्यासाठी जेवण बंद केले होते. या गोष्टीचा विचार करून तिचे वडील आणि मामा यांनी सचिनच्या घरी जाऊन चौकशी करून मुलगा आणि त्याच्या आई-वडिलांना साकोरेपाडा येथे बोलवून घेतले आणि दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने तरुणीच्या लग्नाला होकार देत तिला सचिनसोबत पाठवले. तेव्हा सचिनच्या बहिणीने आणि मेहुण्याने या दोघांना रविवारी कन्हेरवाडी येथील त्यांच्या घरी नेले. यानंतर सोमवारी सकाळी तिन्ही आरोपींनी कन्हेरवाडी येथे येऊन सचिनचा खून केला.
