नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्यसेवा शुभारंभ कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेतून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव पुन्हा एकदा जाणीवपूर्वक वगळण्यात आल्यामुळे महायुतीतील राजकीय संघर्ष थेट पालिका आयुक्तांच्या दालनापर्यंत पोहोचला आहे. संतप्त शिवसैनिकांनी आयुक्तांसमोरच पत्रिका फाडत जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला असतानाच दुसरीकडे भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्याविरोधात जाहीर बंड पुकारले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या कॅबिनेटमध्ये या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊनही मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अगदी आदल्या दिवशी हाच प्रकार पुन्हा घडल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मिलीभगत आणि महायुतीतील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. दरम्यान, आता मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याचे पडसाद उमटू शकतात अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे यावर भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नाईक विरुद्ध मंदा म्हात्रे वाद आला चव्हाट्यावर नवी मुंबईत भाजप विरुद्ध शिंदेसेना वाद पेटलेला असतानाच आता भाजपमधील अंतर्गत गटबाजीचाही मोठा स्फोट झाला आहे. महापालिकेच्या कार्यक्रमातून पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जाणीवपूर्वक वगळल्याने निर्माण झालेल्या वादात आता भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी उडी घेत थेट पक्षाचेच ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्यावर अत्यंत आक्रमक हल्ला चढवला आहे. “माझ्या मतदारसंघात नाईकांचा आमदार निधी कशासाठी? मी अजून जिवंत आणि सक्षम आहे,’ अशा शब्दांत म्हात्रेंनी नाईकांना जाहीरपणे सुनावले. आगामी निवडणुकीला अजून तीन वर्षे बाकी असल्याचे सांगत त्यांनी अधिकृत कार्यक्रमावर पूर्णपणे बहिष्कार टाकला. त्यामुळे हा वाद केवळ निमंत्रण पत्रिकेपुरता मर्यादित नसून नवी मुंबईवरील राजकीय वर्चस्वासाठी नाईक आणि म्हात्रे यांच्यात सुरू असलेल्या तीव्र अंतर्गत सत्तासंघर्षाची किनार त्याला आहे. कल्पना नाही, आयुक्तांना विचारा आरोग्यसेवेच्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत नाव आहे की नाही याविषयी मला कोणतीही कल्पना नाही. याबाबत आपण थेट महापालिका आयुक्तांना विचारून घ्यावे. महायुतीच्या अनुषंगाने ठरलेल्या पद्धतीनेच कारभार व्हावा अशी माझी इच्छा आहे. आमच्यात कोणतीही नाराजी नाही. -गणेश नाईक, मंत्री अधिकाऱ्यांवर कारवाई होणारच गेल्या कॅबिनेट बैठकीत मी स्वतः मुख्यमंत्र्यांसमोर हा प्रश्न उपस्थित केला. ज्या उद्घाटन सोहळ्याच्या पत्रिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाव गायब होते त्याची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. जर हाच प्रकार पुन्हा घडला असेल जबाबदार अधिकाऱ्यांवर निश्चितपणे प्रशासकीय कारवाई केली जाईल. संजय शिरसाट, मंत्री
