Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

शरद पवार- अजित पवारांचा किंगमेकर फॉर्म्युला:मुंबईत नवी राजकीय आघाडी आकारात; स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याच्या हालचाली

राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुंबई महानगरपालिकेत विशेषतः नवे समीकरण तयार होत असल्याचे चित्र दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन नगरसेवक, शरद पवार गटाचा एक नगरसेवक आणि समाजवादी पक्षाचे दोन नगरसेवक मिळून सहा जणांची स्वतंत्र आघाडी स्थापन करण्याबाबत हालचाली सुरू आहेत. ही आघाडी प्रत्यक्षात आल्यास महापालिकेतील सत्तेच्या गणितात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. या सहा नगरसेवकांच्या गटाला स्थायी समितीमध्ये एक जागा, सुधार समितीमध्ये एक जागा आणि शिक्षण समितीमध्ये एक जागा मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर लहान समित्यांमध्येही या गटाला प्रतिनिधित्व मिळू शकते. त्यामुळे आकड्यांच्या खेळात या सहा जणांचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. निवडणुकीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसह लढलेली शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, निकालानंतर मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिक जवळ जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. निवडणुकीत एकमेकांविरोधात असलेले राष्ट्रवादीचे दोन गट आता महापालिकेतील सत्तासमीकरणात एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात असून, यामुळे मुंबईतील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे आहेत. मतदानाच्या निर्णायक क्षणी किंगमेकरची भूमिका राजकीय विश्लेषकांच्या मते, ही संभाव्य आघाडी केवळ समित्यांपुरती मर्यादित राहणार नाही, तर भविष्यात मतदानाच्या निर्णायक क्षणी किंगमेकरची भूमिका बजावू शकते. महापौरपदाची निवड असो किंवा एखादा महत्त्वाचा ठराव, अशा वेळी या सहा नगरसेवकांनी कोणाला पाठिंबा द्यायचा, हे ठरवलं तर त्याचा थेट परिणाम सत्तासमीकरणावर होऊ शकतो. त्यामुळे मुंबईत दोन राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. निवडणुकीपूर्वी वेगळ्या वाटा धरलेल्या या गटांची जवळीक राजकीय वर्तुळात उत्सुकतेचा विषय ठरली आहे. सत्ताधारी पक्षांकडून दबाव दरम्यान, महापौरपद अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव होण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने सत्ताधारी पक्षांकडून या प्रवर्गातील नगरसेवकांवर लक्ष केंद्रित केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेकडे एसटी प्रवर्गातील दोन नगरसेवक आहेत, प्रियदर्शिनी ठाकरे आणि जितेंद्र वळवी. या दोघांवर सत्ताधारी पक्षांकडून दबाव आणला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे ठाकरे गटानेही या दोन्ही नगरसेवकांची विशेष काळजी घेतल्याचं सांगितलं जात आहे. महापौरपदाचं आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी? मुंबई महापौरपदाचं आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी असेल, याची सध्या मोठी उत्सुकता आहे. जर जुन्या चक्राकार आरक्षण पद्धतीनुसार आरक्षण ठरवलं गेलं, तर यावेळी एसटी प्रवर्गासाठी महापौरपद राखीव राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र, नगरसेवकांसाठी ज्या नव्या पद्धतीने आरक्षण काढण्यात आलं, त्याच पद्धतीने महापौरपदाचंही आरक्षण काढलं जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे यंदाची आरक्षण सोडत ही नव्या चक्राकार पद्धतीची सुरुवात मानली जाणार आहे, असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. एसटी प्रवर्गातील नगरसेवकांवर ठाकरे गटाचं वर्चस्व विशेष म्हणजे, अनुसूचित जमाती प्रवर्गातील नगरसेवक हे सध्या केवळ उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडेच आहेत. प्रभाग क्रमांक 53 आणि प्रभाग क्रमांक 121 हे दोन्ही प्रभाग एसटी प्रवर्गासाठी राखीव होते. या दोन्ही ठिकाणी सर्व प्रमुख पक्षांनी उमेदवार दिले होते. मात्र, या दोन्ही प्रभागांमध्ये ठाकरे गटाच्या शिवसेनेचेच उमेदवार विजयी झाले. प्रभाग 53 मधून जितेंद्र वळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अशोक खांडवे यांचा पराभव केला. तर प्रभाग 121 मधून प्रियदर्शिनी ठाकरे यांनी शिंदे गटाच्या प्रतिमा खोपडे यांना हरवलं. त्यामुळे एसटी प्रवर्गातील नगरसेवकांवर ठाकरे गटाचं पूर्ण वर्चस्व आहे. महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी दरम्यान, राज्यातील सर्व 29 महानगरपालिकांमधील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारी रोजी काढली जाणार आहे. नगरविकास विभागाकडून मंत्रालयात ही सोडत काढली जाणार असून, सकाळी 11 वाजता प्रक्रिया सुरू होईल. या सोडतीनंतर कोणत्या महानगरपालिकेत कोणत्या प्रवर्गाचा महापौर बसणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यभरातील राजकीय पक्षांचे लक्ष या सोडतीकडे लागले आहे. नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता मुंबई महापालिकेच्या अंतिम निकालाकडे पाहिल्यास भाजप 89 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागा, काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी काँग्रेसला 3, समाजवादी पक्षाला 2 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 1 जागा मिळाली आहे. एकूण 227 जागांच्या सभागृहात स्पष्ट बहुमत कोणालाही न मिळाल्याने युती, आघाडी आणि रणनीती यांना विशेष महत्त्व आलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबई महापालिकेत आणखी नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!