वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मच्छिंद्र येथे सौर पॅनलचे नुकसान:बुरांडा- कुंभा मार्गावर झाड कोसळल्याने वाहतुकीस अडथळा‎

तालुक्यात शनिवारी दुपारनंतर अचानक झालेल्या वादळ-वाऱ्यासह पावसाने अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान अनेक भागांमध्ये विजेच्या तारा तुटल्या आहेत. झाडे उन्मळून पडली, तर काही गावांतील घरांची छप्परे उडून गेल्याने नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. १३ जून रोजी दुपारच्या सुमारास आकाशात दाट ढग जमा झाल्यानंतर अचानक जोरदार वारे सुरू झाले आणि पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने मार्डी परिसरासह तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठी झाडे उन्मळून पडली. अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागला. मच्छिंद्र येथील शेतकरी प्रताप कुमरे यांच्या शेतात उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. या शिवाय तालुक्यातील काही गावांमध्ये घरांवरील टिनपत्रे व छप्परे उडून गेल्याच्या घटनाही घडल्या. त्यामुळे अनेक कुटुंबांचे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त नागरिकांकडून शासनाकडे मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वादळी वाऱ्यामुळे साखरा–कुंभा मार्गावर एक मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. झाड पडून बराच वेळ उलटूनही ते हटविण्यासाठी कोणतीही यंत्रणा घटनास्थळी पोहोचली नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.

Leave a Comment

error: Content is protected !!