हवामान बदलाचा विपरीत परिणाम विविध पिकांवर होत आहे. यावर्षी खरीप हंगामात ऑक्टोबरपर्यंत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. अजुनही काही भागात जमिनीमध्ये अधिक ओलावा असल्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या झालेल्या नाहीत. अशा परिस्थितीत विविध पिकातील उशिरा तयार होणाऱ्या वाणांची गरज निर्माण झाली आहे. यासाठी बदलत्या हवामानाला अनुकुल असणाऱ्या वाणांची निर्मिती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी केले. महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले कृषि विद्यापीठात विभागीय कृषि संशोधन व विस्तार सल्लागार समिती बैठक रब्बी व उन्हाळी-,२०२५ चे आयोजन हायब्रीड मोडमध्ये करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे, संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे, कोल्हापूरचे विभागीय कृषि सहसंचालक बसवराज मास्तोळी, नाशिकचे विभागीय कृषि सहसंचालक सुभाष काटकर, पुणे विभागीय कृषि सहसंचालक यांचे प्रतिनिधी म्हणुन कृषि अधिकारी राऊत व श्रीरामपूरचे उपविभागीय कृषि अधिकारी प्रविण गोसावी उपस्थित होते. कुलगुरु डॉ. खर्चे म्हणाले, विद्यापीठात होणाऱ्या खरीप दिन, रब्बी दिन अशा कार्यक्रमामध्ये कृषि विभागाने जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आणून विद्यापीठाचे संशोधन त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जेणेकरुन या बैठकीतील प्रत्याभरणाच्या प्रश्नांवर विद्यापीठाचे तंत्रज्ञान वापरता येईल. विद्यापीठात कृषि विभागाच्या मदतीने वर्षभर एकत्र येवून काम करु व शेतकरी बांधवांची अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करुया. डॉ. गोरक्ष ससाणे प्रास्ताविक करतांना म्हणाले, कृषि विभागाच्या अधिकाऱ्यानी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील जवळच्या कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहुन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. डॉ. विठ्ठल शिर्के यांनी संशोधन अहवालाचे सादरीकरण केले. डॉ. साताप्पा खरबडे म्हणाले, पाऊस लांबल्यामुळे पेरण्यासुध्दा लांबल्या. जमिनीतील ओलाव्यामुळे किडी व रोगांचा प्रादुर्भात वाढेल. यावेळी शेतकऱ्यांनी विद्यापीठ प्रसारित करत असलेल्या सल्ला व मार्गदर्शनाचा लाभ घेऊन रोग व किडींचे निर्मुलन करावे. विद्यापीठातील शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वरदान ठरेल पारंपरिक पध्दतीने शेती करण्याचे दिवस आता राहिलेले नाहीत. हवामानाचा विपरित परिणाम जमिनीवर होत आहे. अशा जमिनीत निविष्ठा वापरण्यासाठीचे पोषक वातावरण नसते. परिणामी पिकांची उत्पादकता कमी होते. यासाठी विद्यापीठातील हवामान अद्ययावत काटेकोर शेतीचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना वरदान ठरेल. हे तंत्रज्ञान गाव, तालुका व जिल्हा पातळीवर विस्तार यंत्रणांच्या माध्यमातून पोहोचायला हवे. काटेकोर शेतीचे तंत्रज्ञान वापरले तर निविष्ठा कमी लागतील व परिणामी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होईल,असे कुलगुरू डॉ. खर्चे म्हणाले.
