शहरात रविवार १४ रोजी रात्री ७ वाजताच्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे ७ ठिकाणी मोठे वृक्ष कोसळून विद्युत पुरवठा खंडित झाला. त्याचप्रमाणे बराचवेळ वाहतूकही खोळंबली होती. बेलपुरा, मोतीनगर, भगतसिंग चौक, पुंडलिक बाबा नगर, अंबिका नगर आणि पूनम इलेक्ट्रॉनिक्सजवळ वृक्ष कोसळले. पावसामुळे राजापेठ भुयारी मार्गासह शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचले होते. अनेक प्रमुख मार्गांवर मोठमोठी झाडे उन्मळून पडली, तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून रस्त्यावर कोसळल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला. वादळी पावसामुळे कोसळलेले मोठे वृक्ष बाजुला करण्याचे काम मनपाच्या उद्यान व अग्निशमन विभागाद्वारे रात्री १.३० पर्यंत सुरू होते. मोठ्या आकाराचे वृक्ष कोसळल्यामुळे वीज प्रवाहही खंडित झाला होता. त्यामुळे रात्री झाडांच्या फांद्या कापून वीज वाहिन्या मोकळ्या करण्यात आल्या. त्यानंतरही या परिसरातील विद्युत प्रवाह सुरू करण्यात आला. तोवर परिसरातील नागरिकांच्या झोपेचा खोळंबा झाला होता. रात्री १.३० पर्यंत सुरू होते युद्धपातळीवर काम
