उद्धवसेना फुटीच्या उंबरठ्यावर सहा खासदार दिल्लीत दाखल:आज लोकसभा अध्यक्षांना भेटणार, उपमुख्यमंत्री शिंदेही दिल्लीत

महाराष्ट्राच्या राजकारणात 2022 नंतर पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चिन्हे आहेत. कारण उद्धवसेनेच्या 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र गट स्थापनेची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी ते बुधवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र देऊ शकतात. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंगळवारी रात्री उशिरा दिल्लीला रवाना झाले. सूत्रांनी सांगितले की, बुधवारी सकाळी आधी शिंदेंची या खासदारांसोबत बैठक होईल. त्यात स्वतंत्र गट स्थापन करायचा की शिवसेनेत प्रवेश करायचा, याचा अंतिम निर्णय होईल. दरम्यान, डॅमेज कंट्रोलसाठी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई दिल्लीत गेले. ‘खासदारांना फोडण्यासाठी 15 कोटींची ऑफर’ अशी पोस्ट खा. राऊतांनी सोशल मीडियावर टाकली. त्यापाठोपाठ रोहित पवारांनीही उद्धवसेनेच्या खासदारांविरोधात पोस्ट टाकली. दरम्यान, उद्धवसेनेचे 20 पैकी 16 आमदार फुटणार असेही म्हटले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी 22 तारखेला मुंबईतील ‘शिवालय’ या पक्ष कार्यालयात आमदारांची वन टू वन चर्चेसाठी बैठक बोलावली आहे.
एक्स्पर्ट व्ह्यू डॉ. अनंत कळसे, विधिमंडळ निवृत्त सचिव 6-7 खासदार असतील तरच गटाला मान्यता पक्षांतरबंदी कायद्यानुसार एखाद्या पक्षातून स्वतंत्र गट बाहेर पडण्यासाठी 2/3 सदस्य असणे आवश्यक आहे. उद्धवसेनेचे एकूण 9 खासदार आहेत. तर त्यांना स्वतंत्र गटासाठी 6 वा 7 जण एकत्र येण्याची गरज असेल. त्याचे पत्र लोकसभा अध्यक्षांना द्यावे लागेल. अध्यक्ष खात्री करतील, मगच ते मान्यता देतील. मात्र मान्यता मिळाल्यानंतर या गटाला कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावे लागेल. जसे आता पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा एक गट दुसऱ्या छोट्या पक्षात विलीन झाला, त्याप्रमाणे सेनेच्या फुटीर गटाला कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावे लागेल. फुटीर गटाला स्वतंत्र मान्यता नको : उद्धवसेनेचे लोकसभा अध्यक्षांना पत्र उद्धवसेनेने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना अधिकृत निवेदन दिले आहे. हे पत्र रात्री उशिरा उद्धवसेनेकडून प्रसृत करण्यात आले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हाच संसदेतील एकमेव अधिकृत राजकीय पक्ष म्हणून कायम मान्यता मिळावी तसेच कोणत्याही वेगळ्या गटाला, फुटीर गटाला किंवा स्वतंत्र गट म्हणून ओळख, दर्जा, सुविधा किंवा विशेषाधिकार देऊ नयेत. त्याप्रमाणे अशा कोणत्याही मागणीवर निर्णय घेण्यापूर्वी उद्धव ठाकरे गटाला आपली बाजू मांडण्याची संधी द्यावी, असे संसदीय पक्षाचे नेते आणि खासदार अरविंद सावंत यांनी पत्रात म्हटले आहे. तीन दिवसांत घडल्या तीन महत्त्वाच्या घडामोडी 1 खासदारांना रोखण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रविवारी बैठक घेतली. त्यास 5 खासदार ऑनलाइन उपस्थित असल्याचा राऊतांचा दा‌वा होता. तो खोटा असल्याचे नंतर उघड झाले.
2 बैठकीला ऑनलाइन हजेरी का लावू शकलो नाही, याची कारणे उद्धव ठाकरेंना सांगण्याची तसदीही चार खासदारांनी घेतली नाही, अशीही माहिती सोमवारी समोर आली. खा. बंडू जाधव, खा. संजय देशमुख दिल्लीत दाखल दरम्यान, स्वतंत्र गट स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रांवर हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांची सही घेऊन यवतमाळचे खासदार संजय देशमुख, परभणीचे खासदार बंडू जाधव नांदेडहून दिल्लीत विमानाने दाखल झाले. उद्धवसेनेचे 3 खासदार दोन दिवसांपूर्वीच दिल्लीत पोहोचले. विधान परिषदेच्या निवडणुकीमुळे खा. आष्टीकर दिल्लीला जाऊ शकले नाहीत. परंतु त्यांनी वेगळा गट स्थापण्यासाठी सहमती दिली, अशी माहिती सूत्रांनी दिली. दिव्य मराठी इनसाइड स्टोरी 3 मंगळवारी दुपारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फुटीर खासदारांना दिल्लीकडे जाण्यासाठी विमान उपलब्ध करून दिले. त्यांच्यापाठोपाठ स्वत: शिंदेही स्वतंत्र विमानाने दिल्लीला रवाना झाले.

Leave a Comment

error: Content is protected !!