मंगळवारी राज्य मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आलेल्या पीक परिस्थितीच्या आढाव्यानुसार, जूनच्या पहिल्या पंधरवड्यात महाराष्ट्रात सरासरीच्या केवळ 26 टक्के पाऊस झाला. राज्यात 1 ते 15 जूनपर्यंत 103 मिमी अपेक्षित असताना प्रत्यक्षात फक्त 27.4 मिमी पाऊस झाला. यामुळे सरकारने शेतकऱ्यांना पिकांच्या पेरणीची “घाई न करण्याचा’ सल्ला दिला आहे. विशेष म्हणजे गेल्या 30 वर्षांत पहिल्यांदाच मुंबईत जूनच्या पहिल्या दिवसात पाऊस झालेला नाही. सांताक्रूझ वेधशाळेने आतापर्यंत केवळ 13.1 मिमी पावसाची नोंद केली आहे, तर कुलाबा येथे 5 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 22 जूनपर्यंत छत्रपती संभाजीनगरसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस होईल. विदर्भाच्या काही भागांत उष्णतेची लाट कायम राहू शकते. निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, 23 जूननंतर वातावरणात सकारात्मक बदल होऊन मान्सून तळकोकणातून पुढे सरकण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, 25 जून ते 1 जुलै या कालावधीत मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भ आणि पूर्व मराठवाड्यात मान्सून सक्रिय होऊन जून अखेरीस पावसाच्या आगमनाची दाट शक्यता आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मान्सूनला झालेला विलंब आणि घटणारा पाणीसाठा यांबाबत मंत्रिमंडळाने चिंता व्यक्त केली आणि पाण्याचा वापर जपून करण्यावर भर दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला ऑगस्ट 2027 पर्यंतच्या पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासाठी कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. 1 टक्के पेरण्यांत कापूस, सोयाबीन छत्रपती संभाजीनगर | राज्यात 1.57 कोटी हेक्टर खरीप पिकांचे एकूण क्षेत्र आहे. आतापर्यंत त्यापैकी 1 लाख 43 हजार 940 हेक्टरवर पेरण्या करण्यात आल्या आहेत. हे प्रमाण एकूण क्षेत्राच्या 1 टक्का आहे. गेल्यावर्षी महाराष्ट्रात 4 लाख 23 हजार 875 हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्या होत्या. कापसाचा पेरा 1.12 लाख हेक्टरवर… कृषी विभागाच्या अहवालानुसार, राज्यातील एकूण पेरण्यांपैकी 1 लाख 12 हजार 89 हेक्टरवर कापसाची व त्या खालोखाल मक्याची 10 हजार 216 व सोयाबीनची 7 हजार 988 हेक्टरवर पेरणी झाली आहे. शिवाय 4 हजार 804 हेक्टरवर भातलावणी झाली आहे. मान्सून मुंबईत यायला आणखी 7-8 दिवस नवी दिल्ली | नैऋत्य मान्सूनची पश्चिम शाखा कमकुवत झाली. 8 जूनपासून मान्सून पश्चिम किनारपट्टीवर स्थिर आहे. स्कायमेट या हवामान संस्थेनुसार, मुंबईला मान्सूनसाठी 7-8 दिवस थांबावे लागू शकते. दुसरीकडे, पूर्व शाखा स्थिर गतीने पुढे सरकत असून, ओडिशा, झारखंड आणि बिहारच्या अनेक भागांमध्ये पोहोचली आहे. येत्या 4-5 दिवसांत मान्सून तेलंगणा, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या इतर काही भागांत पुढे सरकू शकतो.
