अकोले आगार राज्यात प्रथम; पण दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची पायपीट कायम:”जेथे उत्पन्न, तेथेच बस” धोरणाने आदिवासी भागातील शिक्षण धोक्यात‎

आदिवासीबहुल अकोले तालुक्यातील एसटी आगाराने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या ‘क’ वर्ग गटात राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. मात्र, या प्रथम पारितोषिकाच्या आनंदावर तालुक्यातील अतिदुर्गम व आदिवासी भागातील दळणवळणाच्या विदारक वास्तवाने विरजण पाडले आहे. “जेथे उत्पन्न, तेथेच बससेवा’ हे ब्रीद घेऊन अकोले आगाराचा कारभार सुरू असल्याने, ग्रामीण भागातील विद्यार्थी, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे हाल गेल्या अनेक महिन्यांपासून सुरूच आहेत. तालुक्यातील अनेक आदिवासी गावे आणि वाड्या-वस्त्यांवरील एसटीच्या फेऱ्या बंद असल्याने शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना दररोज ४ ते ६ किलोमीटर पायी जंगलवाट तुडवत शाळा गाठावी लागते. सध्या तालुक्यात बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढली असून, हिंस्र श्वापदे आणि विषारी सापांच्या वावरामुळे लहान मुले जीव धोक्यात घालून शिक्षणाची पायपीट करत आहेत. वाहतुकीची सोय नसल्याने काही पालकांनी तर मुलांची शाळा बंद करण्याचा विचार सुरू केला आहे. जर असे घडले, तर अकोले आगाराचा हा प्रथम पुरस्कार केवळ कागदावरच राहील आणि दुर्गम भागातील शिक्षणाची ज्योत विझेल, अशी भीती व्यक्त होत आहे. खासगी जीपचे भाडे परवडत नसल्याने आदिवासी बांधवांना पायी चालण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ‘शेवटच्या माणसापर्यंत एसटी पोहोचली का? हा प्रश्न आजही अनुत्तरीतच आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागांतून बसफेऱ्या बंद असल्याने हा प्रथम पुरस्कार कशासाठी? असा सवाल आदिवासी सेवक काशिनाथ साबळे, सुरेश भांगरे, सयाजी अस्वले व गंगाराम धिंदळे यांनी उपस्थित केला आहे. अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी बस स्वप्नच ग्रामीण भागांतील बससेवेअभावी आदिवासी विद्यार्थ्यांची ५ किमीची जीवघेणी पायपीट होतेय. पुरुषवाडी, बलठण, वांजुळशेत, माणिक ओझर, गोंदुशी, खडकी या डोंगराळ व जंगलव्याप्त भागांतील विद्यार्थी मवेशी येथील विद्यालयात येतात. अकोले आगाराने राज्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले असले तरीदेखील अतिदुर्गम आदिवासी भागांतील विद्यार्थ्यांसाठी सार्वजनिक बससेवा केवळ एक स्वप्नच ठरली आहे. – शांताराम काळे, सचिव, श्री स्वामी समर्थ विद्यालय, राजूर.

Leave a Comment

error: Content is protected !!