केतन अग्रवालची हत्या अनाकलनीय:मुख्यमंत्र्यांचा सुशिक्षित तरुणांच्या मानसिकतेवर सवाल, नसरापूर खटल्याच्या वेगवान निकालाचे केले कौतुक

लोहगड किल्ल्यावरून ढकलून करण्यात आलेली केतन अग्रवालची हत्या खरोखरच अनाकलनीय आणि धक्कादायक आहे. समाज म्हणून आपण याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे,” अशी तीव्र प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. चांगल्या घरच्या आणि सुशिक्षित मुलांमध्ये अशी सूडबुद्धी आणि गुन्हेगारी प्रवृत्ती का निर्माण होते, याचा केवळ कायदेशीरच नाही तर सामाजिक अँगलनेही तपास झाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर केतन अग्रवालची त्याची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांनी मिळून निर्घृण हत्या केली होती. काय आहे नेमके प्रकरण? पुण्यातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतनचा त्याची भावी पत्नी सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून खून केल्याचे पोलिस तपासात दिसून आले. या दोघांना न्यायालयाने २९ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अटकेनंतर सियाचा प्रियकर चेतनने रडत रडत स्वत:चे वडील बाबूलाल चौधरी यांना सांगितले की, घटना घडली तेव्हा सिया केतनजवळ उभी होती, मी तर दूर उभा होतो. पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले की, जानेवारी ते जून २०२६ या सहा महिन्यात सिया व चेतनमध्ये २००४ कॉल झाले होते. नसरापूरच्या नराधमाला मृत्यूदंडाची मागणी याचवेळी पुण्याच्याच नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या ६५ वर्षीय भिमराव कांबळे या नराधमावरही मुख्यमंत्र्यांनी कडक शब्दांत भाष्य केले. विशेष न्यायालयाने या नराधमाला आधीच दोषी ठरवले असून, २९ जून रोजी त्याची शिक्षा सुनावली जाणार आहे. “हे अत्यंत दुर्मिळ आणि क्रूर प्रकरण असून, आम्ही न्यायालयाने या हैवानाला थेट मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे, न्यायालय ती मान्य करेल अशी पूर्ण अपेक्षा आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. दोन महिन्यांत ऐतिहासिक निकाल १ मे २०२६ रोजी नसरापूरमध्ये घडलेल्या या पाशवी घटनेनंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयमाला पवार यांनी अवघ्या १५ दिवसांत तपास पूर्ण करत १२०० पानांचे आरोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. विशेष म्हणजे, न्यायालयाने सुट्टीच्या दिवसांतही काम करून केवळ दोन महिन्यांत हा खटला निकाली काढला आहे. राज्यातील हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान ऐतिहासिक खटला ठरला असून, अशा जलद निकालांमुळे गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. हे ही वाचा..
दावा- केतनला धक्का दिल्यानंतर सिया मदतीसाठी ओरडली:आई म्हणाली- मुलगी दोषी असेल तर तिलाही किल्ल्यावरून खाली फेका पुण्यातील केतन अग्रवाल खून प्रकरणात नवीन खुलासा झाला आहे. केतनला ज्या लोहगड किल्ल्यावरून ढकलण्यात आले होते, तेथील रक्षकाने सांगितले की, त्याने सियाच्या ओरडण्याचा आवाज ऐकला होता. रक्षक धीरज जाधव यांच्या म्हणण्यानुसार, ओरडण्याचा आवाज ऐकून ते घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुख्य आरोपी आणि सिया गोयल मदतीसाठी ओरडत होते. मी सिया गोयलला विचारले काय झाले, तेव्हा ती म्हणाली की, येथून कोणीतरी खाली पडले आहे. यानंतर मी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. सविस्तर वाचा

Leave a Comment

error: Content is protected !!