राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. अर्ज भरण्यास अवघा एक दिवस शिल्लक असतानाही अनेक पक्षांनी आपल्या उमेदवारांची अधिकृत घोषणा केलेली नाही. विशेषतः शरद पवार यांच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे विरोधी आघाडीत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे सत्ताधारी महायुतीही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. शरद पवारांना उमेदवारी न दिल्यास भाजप मोठा निर्णय घेऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागांसाठी निवडणूक होत आहे. यापैकी सहा जागा महायुतीकडे तर एक जागा महाविकास आघाडीकडे असल्याचे संख्याबळाचे चित्र आहे. महायुतीमध्ये भाजपला चार, शिंदे गटाच्या शिवसेनेला एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा अपेक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्थ पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. मात्र भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे राजकीय उत्सुकता अधिक वाढली आहे. महाविकास आघाडीत एकमेव जागेसाठी तिन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असल्याचे दिसते. ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि पवार गट या तिन्ही पक्षांनी या जागेवर दावा केला आहे. काँग्रेसकडून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दा पुढे करून आपला दावा कायम ठेवण्यात येत आहे. तर शिवसेनाही आपली संख्याबळाची बाजू मांडत आहे. या सगळ्यात शरद पवार यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले तरी अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे अंतिम क्षणी काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, शरद पवारांना उमेदवारी मिळाली नाही तर भाजप पाचवा उमेदवार रिंगणात उतरवण्याच्या तयारीत असल्याची चर्चा रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पवार उमेदवार नसतील तर भाजप पाच उमेदवार देऊ शकतो, तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी एक उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत वेगळीच चुरस निर्माण होऊ शकते. सत्ताधारी आघाडी विरोधकांच्या भूमिकेवर लक्ष ठेवून पुढील डाव आखत असल्याचे चित्र आहे. एकनाथ शिंदे आज घोषणा करू शकतात शिंदे गटाच्या शिवसेनेतही उमेदवारीवरून चर्चा सुरू आहे. राहुल शेवाळे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात असले तरी ज्योती वाघमारे, शायना एनसी, संजय निरुपम यांची नावेही चर्चेत आहेत. तसेच ज्येष्ठ नेते गजानन किर्तीकर यांनीही राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज या संदर्भात निर्णय घेण्याची शक्यता असून ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंतिम घोषणा करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. देशभरातील 37 जागांसाठी निवडणूक राज्यसभा निवडणुकीसाठी येत्या 16 तारखेला मतदान होणार आहे. देशभरातील 37 जागांसाठी ही निवडणूक होत असून त्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक सात जागा आहेत. तामिळनाडूत सहा, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी पाच, ओडिशामध्ये चार, आसाममध्ये तीन, तेलंगणामध्ये दोन तर छत्तीसगड, हरियाणा आणि हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एक जागेसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील या राजकीय हालचालींचा प्रभाव राष्ट्रीय पातळीवरही दिसून येणार आहे. आता अंतिम क्षणी कोणत्या पक्षाची चाल यशस्वी ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.