ठाणेदार सागर दानडे यांच्या हस्ते ‘विशेष प्रवास पास’ वितरण सुरू!
सुरेश पाचभाई मारेगाव
मारेगाव :आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे जाणाऱ्या मारेगाव तालुक्यातील हजारो वारकरी आणि भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी मारेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार सागर दानडे यांच्या मार्गदर्शनाखाली एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
तालुक्यातील सर्व पंढरपूर भक्तांना आणि दिंड्यांना मारेगाव पोलीस ठाण्यातून ‘विशेष प्रवास पास’ वितरित करण्यात येत आहेत. स्वतः ठाणेदार सागर दानडे यांच्या हस्ते या पासेसचे वाटप केले जात असून, तालुक्यातील सर्व जनतेने आणि भाविकांनी हा अधिकृत पास घेऊनच प्रवासाला सुरुवात करावी, असे जाहीर आव्हान मारेगाव पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
पास घेण्याचे मुख्य कारण आणि कायदेशीर महत्त्वधार्मिक यात्रांच्या काळात महामार्गांवर वाहनांची प्रचंड गर्दी असते.अशा वेळी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भक्तांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडे प्रवाशांची नोंद असणे आवश्यक आहे.
प्रवासादरम्यान कोणतीही आपत्कालीन परिस्थिती, अपघात किंवा वैद्यकीय अडचण निर्माण झाल्यास, या पासच्या नोंदीमुळे मारेगाव पोलिसांना तात्काळ मदत पोहचवणे शक्य होणार आहे.हा पास भाविकांसाठी प्रवासातील एक सुरक्षिततेचे कायदेशीर कवच ठरणार आहे.
ठाणेदार सागर दानडे यांचे जाहीर आवाहन:”मारेगाव तालुक्यातील प्रत्येक माऊलीचा आणि भाविकाचा पंढरपूरचा प्रवास निर्विघ्न पार पडणे ही आमची प्राथमिकता आहे. प्रवासात कोणतीही अडचण येऊ नये म्हणून मारेगाव पोलीस ठाण्यातून हे पास मोफत दिले जात आहेत.
तालुक्यातील सर्व पायी दिंड्यांचे प्रमुख, खाजगी वाहन चालक आणि भाविकांनी पोलीस स्टेशनला भेट देऊन आपले पास घेऊन जावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे.”भाविकांसाठी आवश्यक माहिती:पास मिळण्याचे ठिकाण: मारेगाव पोलीस स्टेशन.
पास मिळण्याची वेळ: कार्यालयीन वेळेत (सकाळी १०:०० ते संध्याकाळी ६:००).आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, वाहनाचा क्रमांक (वाहन असल्यास), चालकाचा परवाना (Driving License) आणि सोबत असणाऱ्या सर्व प्रवाशांची नावे व मोबाईल नंबर.
मारेगाव पोलीस प्रशासनाच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, सर्व भक्तांनी पास घेऊनच पुढील प्रवासाचे नियोजन करावे, अशी विनंती पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आली आहे.