बातमी ऐका (Marathi Voice Reader)
सोलापूर : शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय करत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कुरुल येथील आनंद जाधव यांनी देशी कुक्कुटपालन व्यवसाय यशस्वी केला आहे. पारंपरिक शेतीतील अनिश्चितता लक्षात घेऊन त्यांनी हा पूरक व्यवसाय सुरू केला. आता यामधून 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल महिन्याला होत आहे.
शेतकरी आनंद जाधव यांनी दोन वर्षांपूर्वी देशी कुक्कुटपालनाचा व्यवसाय सुरू केला. बाजारात देशी कोंबड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यांनी हा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी केवळ 8 ते 10 कोंबड्यांपासून या व्यवसायाची सुरुवात केली. जाधव यांनी योग्य संगोपन, लसीकरण आणि आहार व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले. नैसर्गिक वातावरणात कोंबड्यांची जोपासना केल्यामुळे त्यांच्या पक्ष्यांची संख्या आणि गुणवत्ता वाढली. कमी भांडवलात सुरू केलेला हा प्रयोग आता एका मोठ्या उद्योगात रूपांतरित झाला आहे.
आर्थिक उलाढाल
सध्या आनंद जाधव यांच्या देशी कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून दरमहा 6 ते 7 लाख रुपयांची उलाढाल होत आहे. त्यांची मेहनत, बाजारपेठेचा अभ्यास आणि चिकाटी यामुळे त्यांना हे यश मिळाले आहे.
इतरांसाठी प्रेरणा
आनंद जाधव यांचा हा यशस्वी प्रवास मोहोळ परिसरातील आणि जिल्ह्यातील इतर तरुण शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीपूरक व्यवसायाची कास धरल्यास ग्रामीण भागातही रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, हे त्यांनी दाखवून दिले आहे.