शेतकऱ्याचे मोठे नुकसान; भरपाईची मागणी
सुरेश पाचभाई । मारेगाव
मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर आनंदराव सुरतेकर यांच्या शेतातील तुरीचे पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केल्याची घटना तीन दिवसांपूर्वी घडली. त्यांचे शेत गट क्रमांक १२८ मधील सुमारे तीन एकर क्षेत्रावरील तूर पीक रानडुकरांनी रात्रीच्या सुमारास अक्षरशः फस्त केल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

सुरतेकर यांची बुरांडा (ख) शिवारात सुमारे साडेसात एकर शेती असून, यावर्षी त्यांनी कपाशी, तूर व गहू अशी मिश्र पिके घेतली होती. मात्र, यंदा झालेल्या सततधार पावसामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. त्यातच रानडुकरांबरोबरच रोह्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकऱ्यांची अडचण अधिकच वाढली आहे.

रानडुकरांच्या हल्ल्याची माहिती शेतकरी ज्ञानेश्वर सुरतेकर यांनी तत्काळ वन विभागाला दिली असल्याचे सांगितले. मात्र, परिसरात वारंवार होत असलेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी हतबल झाले असून, शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

