दुष्काळी भागात पाणी साठवण क्षमतेत वाढ; शेतकऱ्यांना शेतीसाठी दिलासा
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव : तालुक्यात जलसंवर्धनाला चालना देण्यासाठी लोकसहभागातून विविध गावांमध्ये वनराई बंधारे उभारण्याची मोहीम तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने राबविण्यात येत आहे. उपविभागीय कृषि अधिकारी चंदन निघोट यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वीपणे सुरू असून अनेक गावांमध्ये वनराई बंधारे उभारण्यात आले आहेत.
या मोहिमेत छोटे ओढे व नाल्यांमधील वाहते पाणी रिकाम्या सिमेंट बॅगमध्ये रेती भरून अडविण्यात येत आहे. साठवलेल्या पाण्याचा उपयोग रब्बी पिकांसाठी संरक्षित ओलित करण्यासाठी होत आहे. वनराई बंधाऱ्यांमुळे पाणी जमिनीत मुरत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी वाढते, जलस्रोत पुनर्जीवित होतात तसेच जनावरांसाठी शिवारात पिण्याचे पाणी उपलब्ध होते, अशी माहिती मंडळ कृषि अधिकारी किशोर डोंगरकार यांनी दिली.

तालुक्यातील गावोगावी लोकांचा सहभाग घेत तालुका कृषि अधिकारी कार्यालयातील सर्व सहायक कृषि अधिकारी श्रमदानातून वनराई बंधारे बांधकामाची मोहीम राबवत आहेत. आकापुर येथे बंधारे बांधताना सहायक कृषि अधिकारी रणजित सोयाम, कृषी सेवक सौदागर यादव यांच्यासह रविंद्र भोडे, मनोज निखाडे, स्वाती कुळमेथे तसेच ग्राम कृषी विकास समितीचे सहकार्य लाभले.
मोहिमेअंतर्गत उभारण्यात आलेल्या वनराई बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात जलसंवर्धन होणार असून यामुळे तालुक्यातील गावे पाणीदार होण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास तालुका कृषि अधिकारी दिपाली खवले यांनी व्यक्त केला.
