२८ जानेवारीपासून बेमुदत उपोषण
ज्ञानेश्वर आवारी | झरी जामणी
झरी जामणी तालुक्यातील मौजा अडेगाव (खंड क्रमांक १) येथील सर्व्हे क्रमांक ५१ मधील शेतकऱ्यांच्या शेतात जाणारा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता कथितरीत्या बेकायदेशीररीत्या बंद करण्यात आल्याने परिसरात तीव्र असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा, या मागणीसाठी आज दिनांक २८ जानेवारी २०२६ पासून अडेगाव येथील शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.

या प्रकरणी अडेगाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, यवतमाळ यांच्याकडे सविस्तर निवेदन सादर केले असून, त्यामध्ये नमूद केल्यानुसार १५ जानेवारी २०२६ रोजी तहसीलदार, झरी जामणी यांच्याकडे रस्ता खुला करून देण्याबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
दरम्यान, लोधा सोलर प्लॅन्ट कंपनीने शेतात जाणारा पारंपरिक वहिवाटीचा रस्ता जाणीवपूर्वक बंद केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. विशेष म्हणजे १६ जानेवारी २०२६ रोजी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा करून संबंधित रस्ता मोकळा ठेवण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. असे असतानाही, सदर आदेशांचे उल्लंघन करून रात्रीच्या सुमारास पुन्हा रस्ता बंद करण्यात आल्याचा दावा शेतकऱ्यांनी केला आहे.

याशिवाय, कंपनी परिसरातून जाणारा रस्ता सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून बंद करण्यात आल्याचा आरोप शेतकरी दिवाकर दादाजी काळे यांच्यावर करण्यात आला असून, सदर अतिक्रमण तात्काळ हटवून रस्ता पूर्ववत खुला करण्याची मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी प्रशासनाला २७ जानेवारी २०२६ पर्यंत रस्ता खुला करून देण्याची अंतिम मुदत दिली होती. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने २८ जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे. या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असेही शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

या निवेदनाच्या प्रती तहसीलदार झरी जामणी, ठाणेदार मुकुटबन, पोलीस अधीक्षक यवतमाळ, उपविभागीय अधिकारी पांढरकवडा तसेच राज्याचे महसूल मंत्री यांना पाठविण्यात आल्या आहेत. प्रशासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देणार की आंदोलन तीव्र होणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
