-तहसीलदार उत्तम निलावाड
-नवरगांव येथील कार्यक्रमामध्ये केले वक्तव्य.
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,
मारेगांव:-कोतवाल हा तहसीलचा कणा आहे.त्यांच्याशिवाय अनेक कामे अपूर्ण आहे.पद कोणतेही असले तरी ते लहान नसते.त्या पदाला न्याय देण्याचे काम खऱ्या अर्थाने तुम्ही कोतवाल लोक करीत आहात असे वक्तव्य तहसीलदार उत्तम निलावाड यांनी केले.
ते कोतवाल संघटनेतर्फे दि.25 जूनला नवरगांव येथील स्नेहभोज कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त तलाठी रामदास वरारकर,क.ली. गजानन ढेंगळे,तुळसामाता देवस्थान नवरगांवचे सचिव विलास नक्षीने,कोतवाल संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत निमसटकर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलतांना तहसीलदार निलावाड म्हणाले की, तहसील कार्यालयामध्ये अशी अनेक कामे आहेत जी कोतवाल सक्षमपणे करू शकतात.व्यक्ती हा पदाने लहान किंवा मोठा होत नसतो तर कार्य करण्याची उर्मी आणि कार्यनिष्ठा ही त्या व्यक्तीला महान बनवत असते.
काही ठिकाणी रेतीच्या अवैध वाहतुकीवर आम्ही धाडी टाकल्या त्यावेळीही आम्हाला कोतवाल बांधवांचे मोठे सहकार्य लाभले.कदाचित त्यांच्याविना ही प्रक्रिया अधुरी राहिली असती असेही तहसीलदार निलावाड म्हणाले.
कार्यक्रमाचे संचालन तालुका अध्यक्ष सुरेश येरमे यांनी, प्रास्ताविक अतुल बोबडे यांनी तर आभार प्रदर्शन कु.रोशनी वरखडे यांनी केले.यावेळी कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व कोतवाल बांधव त्यांच्या कुटुंबियांसमवेत उपस्थित होते.
