Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

भाजप पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंसोबत युती नको:पत्र लिहून व्यक्त केली नाराजी; युती झाल्यास काम न करण्याचा इशाराही दिला

राज्यात महायुतीच्या माध्यमातून महापालिका निवडणुका लढवण्याची अधिकृत घोषणा झाली असली, तरी ठाणे शहरात भाजपमध्ये या निर्णयाविरोधात तीव्र असंतोष उफाळून आला आहे. आम्हाला युती नको, आम्ही स्वबळावरच निवडणूक लढवणार, अशी ठाम आणि आक्रमक भूमिका ठाण्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतली आहे. स्थानिक आमदार, जिल्हाध्यक्ष आणि शहर नेतृत्वाकडे थेट नाराजी व्यक्त करण्यात आली असून, यामुळे ठाण्यात महायुतीसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच भाजपमधील ही धुसफूस उघडपणे समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या नाराजीमागे मागील काही महिन्यांपासून सुरू असलेला भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील संघर्ष कारणीभूत ठरत आहे. दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे स्वबळावर लढा, हा नारा देत कार्यकर्त्यांना तयारीला लावले होते. अनेक प्रभागांमध्ये इच्छुक उमेदवारांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक केली, प्रचारयंत्रणा उभारली आणि स्थानिक पातळीवर बांधणी सुरू केली होती. अशा परिस्थितीत अचानक युतीची घोषणा झाल्याने अनेक कार्यकर्त्यांची स्वप्ने भंग पावण्याची भीती आहे. युती झाल्यास जागा कमी मिळतील, उमेदवारीची संधी गमावली जाईल, ही भावना ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र झाली आहे. या असंतोषाचे ठळक रूप म्हणजे ठाण्यातील 18 प्रांत अध्यक्षांनी एकत्र येत युती नको, असा ठाम संदेश देणारे पत्र जिल्हाध्यक्ष आणि स्थानिक आमदारांकडे सादर केले आहे. या पत्रात भाजपने स्वबळावर लढण्याची ताकद असल्याचा ठाम दावा करण्यात आला असून, युतीमुळे पक्षाचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कार्यकर्त्यांनी मागील काळात केलेल्या संघर्षाची आठवण करून देत, आम्ही मेहनत घेतली, जनाधार वाढवला आणि आता संधी गमावायची नाही, अशी भूमिका पत्रातून मांडण्यात आली आहे. या पत्रामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर दबाव वाढला असून, वरिष्ठ पातळीवरही ठाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. युती झाल्यास काम न करण्याचा इशाराही दिला दरम्यान, नाराज कार्यकर्त्यांनी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि शहराध्यक्ष संदीप लेले यांची भेट घेऊन लेखी निवेदने दिली आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी तर युती झाल्यास काम न करण्याचा इशाराही दिला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला संधी मिळावी आणि ठाण्यात भाजपची ओळख, ताकद आणि नेतृत्व टिकून राहावे, ही त्यांची मुख्य मागणी आहे. यावर प्रतिक्रिया देताना जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांची भावना स्पष्ट आहे आणि त्यांचा रोष आम्हाला समजतो. मात्र, अंतिम निर्णय वरिष्ठ नेत्यांचा असतो आणि तो मान्य करणे भाग आहे. तरीही नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कमी जागा मिळाल्यास असंतोष उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाण्यात प्रभाव असला, तरी भाजपनेही गेल्या काही वर्षांत शहरात मजबूत संघटन उभारले आहे. त्यामुळे जागावाटपात भाजपला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यास असंतोष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. आता या पेचप्रसंगातून भाजपचे वरिष्ठ नेते कोणता तोडगा काढतात, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!