सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत गंभीर शंका व्यक्त केली आहे. पार्थ पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या तिघांनी मिळून तर काही केले नाही ना? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. अजित पवारांच्या निधनाचे त्यांना काहीच दु:ख दिसून येत नाही ते आपआपल्या कामात व्यस्त लगेच व्यस्त झाल्याचे म्हणत त्यांनी हा सवाल केला आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, आपल्या घरात जर 10-15 वर्षांपासून एखादा कुत्रा असेल आणि तो गेला तर घरात शोक पाळला जातो. पण सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ सर्वच त्यांच्या कामात व्यस्त झाली आहेत. मला 3 जणांवर शंका आहे की त्यांनी मिळून तर काही केले नाही ना? असा प्रश्न माझ्या मनात पडतो आहे. ही विकृत प्रवृत्ती यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे म्हणाले की, याच्यापेक्षा नीच वक्तव्य काही असूच शकत नाही. ज्या मुलाने आपले वडील गमावले आहे, ज्या नेत्यांनी आपला नेता गमावला आहे, त्यांच्या मृत्यू बद्दल इतक्या खालच्या पातळीवर वक्तव्य करणे याला केवळ नीच किंवा विकृत प्रवृत्ती म्हणू शकतो. यापेक्षा जास्त त्यांच्यावर बोलण्याइतकी त्यांची लायकी नाही. चौकशी व्हावी ही पक्षाची भूमिका आनंद परांजपे म्हणाले की, राज्य सरकारने अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी लावलेली आहे. काल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अपघाताची संपूर्ण चौकशी झाली पाहिजे आणि तो अहवाल जनतेसमोर आला पाहिजे ही मागणी केलेली आहे. या दुर्दैवी अपघाताची चौकशी झाली पाहिजे हीच आमची भूमिका आहे. एखादा मुलगा आपल्या वडीलांबरोबर असे काही करु शकेल हा विचार म्हणजे नीचता आहे.
चौकशी करा – ममता बॅनर्जी अजितदादांच्या विमान अपघाती मृत्यूनंतर तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी सशंय व्यक्त करत ‘कोणीही सुरक्षित नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली योग्य चौकशी आवश्यक आहे. हे अनावश्यक भीती निर्माण करणारे आहे की कट आहे, हे काळच सांगेल. तथापि, सर्वात सोपा मार्ग म्हणजे पायलटला दोष देणे, जसे आपण मागील दोन प्रकरणांमध्ये पाहिले आहे,’ असे म्हटले होते. राजकारण नको – शरद पवार शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत यात राजकारण आणू नका, असे आवाहन केले होते. शरद पवार म्हणाले होते की, ‘अजित पवार यांचा हा अपघाती मृत्यू आहे. त्याचा महाराष्ट्राला प्रचंड असा धक्का आहे. एक कर्तृत्ववान, निर्णय घेण्याची शक्ती ज्यांच्यात आहे, अशा व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे. जे काही नुकसान झाले ते भरून निघणारे नाही. पण सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हा अपघात आहे. यामागे काही राजकारण आहे, अशा प्रकारची भूमिका मांडली गेली. मात्र, याच्यात राजकारण नाही. हा निव्वळ अपघात आहे. त्याच्या यातना महाराष्ट्राला, आम्हा सगळ्यांना आहेत. कृपा करून इथे राजकारण आणू नये,’ असे आवाहनही त्यांनी केले होते. मात्र, त्यानंतरही आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत.
