हिंगोली जिल्ह्यात मतमोजणी तसेच मतमोजणीनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जिल्हाभरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार असून ५७ पोलिस अधिकारी, ४९० पोलिस कर्मचाऱ्यांसह राज्य राखीव दलाचे जवान कार्यरत राहणार आहेत. कुठेही अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न झाल्यास तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, कळमनुरी व वसमत पालिकेची निवडणूक प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीची मतमोजणी रविवारी ता. २१ होणार आहे. मतमोजणीच्या काळात तसेच मतमोजणी नंतर कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी पोलिस दल सतर्क झाले आहे. दरम्यान, पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात दोन पोलिस उपाधीक्षक, ५७ पोलिस अधिकारी, ४९० पोलिस कर्मचारी, ६०० गृहरक्षक दलाचे जवान, दोन दंगा काबू पथक, राज्य राखीव दलाची तुकडी तैनात केली जाणार आहे. या शिवाय जिल्हाभरात गस्तीसाठी ४४ वाहने उपलब्ध करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे यांचे स्वतंत्र पथक हिंगोली शहरात तैनात केले जाणार आहे. जिल्ह्यातील तीनही पालिकांच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात तसेच शहरातील संवेदनशील भागात पोलिसांंची गस्त राहणार आहे. तसेच मतमोजणी केंद्राच्या बाहेर हुल्लडबाजांना रोखण्यासाठी पोलिस विभागाच्या वतीने छायाचित्रीकरण केले जाणार आहे. जिल्ह्यात मतमोजणी नंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर तसेच अनुचीत प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिले आहेत.
