राज्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तातडीच्या दिल्ली दौऱ्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. आज (दि. १७) सकाळी ११ ते १२.२० या दरम्यान एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘लोककल्याण मार्ग’ या निवासस्थानी भेट घेऊन दीड तास सखोल चर्चा केली. कोण काय बोलते, ते बोलू द्या.. मला जे करायचे ते करतो, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांसोबतच्या भेटीनंतर दिली. पंतप्रधान मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्यातील ही चर्चा सुमारे ८० ते १२० मिनिटे चालली. अधिकृतपणे ही ‘सदिच्छा भेट’ असल्याचे सांगितले जात असले, तरी सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी निवडणुकांमधील जागावाटप आणि महायुतीतील समन्वयावर यात सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती आहे. विशेषतः, मागील काही निवडणुकांमध्ये मित्रपक्षांकडून शिवसेनेला अपेक्षित सहकार्य मिळाले नसल्याचा एक ‘अंतर्गत अहवाल’ शिंदे यांनी पंतप्रधानांसमोर मांडल्याचे समजते. काही विशिष्ट मतदारसंघांतील पराभवाचे विश्लेषण आणि आगामी निवडणुकीतील चुका टाळण्यासाठीची रणनीती यावर या बैठकीत भर देण्यात आला. नेमके काय म्हणाले एकनाथ शिंदे? अधिवेशन सोडून दिल्लीत जाण्यावरून विरोधकांनी केलेल्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतूनच जोरदार प्रत्युत्तर दिले. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेच्या खासदारांना भेटायला येत असतो, त्यांच्यासोबत काल बैठक झाली. आज पंतप्रधान मोदी यांनाही भेटलो. त्यांच्यासोबत महाराष्ट्रातील अनेक विषयावर चर्चा झाली. सकारात्मक चर्चा झाली. अधिवेशन सुरू असेल तेव्हा मी दिल्लीत येत असतो. तशीच ही सदिच्छा भेट होती. एकनाथ शिंदे म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी इराण आणी इस्रायल यांच्यातील युद्धाबाबत चर्चा केली. देशातल्या सगळ्यांनी एकसंघ राहिले पाहिजे. एनडीए संपूर्णपणे मोदींच्या पाठिशी आहे. दुबई, मस्कत, कुवेतमध्ये अडकलेल्या भारतीयांना आणण्याचे कामही केले आहे. मी मोदींना हेदेखील सांगितले की अनेक देशांशी तुमचे चांगले संबंध आहेत. देश जेव्हा अडचणीत असतात तेव्हा एकमेकांना मदत करतो. इराणजवळील होर्मुझ मार्गातून दोन जहाजे आली आहेत. याबाबतही चर्चा झाली आहे. टीकाकारांना कामातून उत्तर देतो “कोण काय टीका करतंय यापेक्षा मला जे करायचे आहे ते मी करत असतो. मी टीकाकारांना माझ्या कामातून उत्तर देतो. पंतप्रधान मोदींनी युद्धात अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणले, अशा जागतिक विषयांवर आणि देशाच्या विकासावर आमची चर्चा झाली. पाच राज्यांच्या निवडणुकीतही एनडीएला मोठे यश मिळेल,” असेही शिंदे म्हणाले. उद्धव ठाकरेंना मदत करणार का? उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का?, असं पत्रकारांनी प्रश्न विचारताच राज्यसभेची निवडणूक झाली. आता विधानपरिषदेची निवडणूक येईल, तेव्हा बघू, असं एकनाथ शिंदेंनी हसतहसत उत्तर दिलं. संसदेत रंगली ‘रिजिजू-शिंदे’ केमिस्ट्री दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज संसदेत देखील गेले होते. तिथे त्यांची भेट केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्याशी झाली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेही सोबत होते. रिजिजू यांनी श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख ‘मेरा छोटा भाई’ असा केल्याने या आपुलकीच्या संभाषणाची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यापूर्वी त्यांनी सभापती ओम बिर्ला यांची भेट घेऊन विविध संसदीय विषयांवर चर्चा केली.
