घोषणांचा सुकाळ, पण अंमलबजावणीचा दुष्काळ:शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा हवेत विरली, शरद पवार गटाची सरकारवर टीका

सरकारने भिमदेवी थाटात 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा केली होती. पण 2025 संपत आले तरी शेतकऱ्यांचे उत्पन्न काही दुप्पट झाले नाही. यावरून निवडणुकीवेळी सरकारकडे घोषणांचा सुकाळ, पण अंमलबजावणीबाबत दुष्काळ असल्याचे स्पष्ट होते, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारण तापले आहे. सत्ताधारी व विरोधी पक्ष दररोज एकमेकांवर चिखलफेक करत एकमेकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सरकारवर शेतकऱ्यांच्या दैनावस्थेला जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले, 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा सरकारने राणा भिमदेवी थाटात केली होती. आज 2025 साल संपत आलं तरी शेतकऱ्यांचं उत्पन्न काही दुप्पट झालं नाही, पण सोयाबीन, कापूस, तूर आदी प्रमुख मालाला हमीभाव मिळणंही कठीण झालं. बहुतांश शेतकऱ्यांना अनुदानच मिळाले नाही अशातच शेतकऱ्यांसाठी विविध याजनांची खैरात करणाऱ्या सरकारला या योजनांसाठी निधीची तरतूदही करता आली नाही. त्यामुळं या योजनांसाठी गेल्या चार वर्षात अर्ज केलेल्या 56.17 लाख शेतकऱ्यांपैकी 38 लाखांपेक्षाही अधिक शेतकऱ्यांना या योजनांचा लाभ हे सरकार देऊ शकलं नाही. केवळ 18.46 लाख शेतकऱ्यांनाच योजनांचा लाभ दिला, पण त्यांतील अनेकांचं अनुदान अद्याप मिळालेलं नाही. यावरुन निवडणुकीच्यावेळी सरकारकडं शेतकऱ्यांसाठीच्या योजनांच्या घोषणांचा सुकाळ असतो पण अंमलबजावणीबाबत मात्र दुष्काळ असल्याचं स्पष्ट होतं. माझी सरकारला विनंती आहे की, मतांसाठी शेतकऱ्यांना न झुलवता अर्ज केलेल्या सर्व शेतकऱ्यांना हव्या असलेल्या योजनांचा लाभ द्यावा, अन्यथा या आकडेवारीच्या निमित्ताने सरकारचं पितळ उघडं पडलंच आहे, त्यामुळं या निवडणुकीत हेच शेतकरी सरकारला राजकीय दुष्काळात पाठवल्याशिवाय राहणार नाहीत, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. जामखेडमधील गुन्हेगारीचा पोशिंदा कोण? उल्लेखनीय बाब म्हणजे रोहित पवारांनी कालच कर्जत – जामखेड येथील कथित गुन्हेगारीवरून विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. जामखेडमधील हॉटेल कावेरीचे मालक रोहित अनिल पवार यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी ज्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला ते हे आहेत जामखेडमधील उल्हास विलास माने. याआधीही त्यांच्यावर डबल मर्डरचे गुन्हे दाखल आहेत. आता त्यांच्या पाठीशी कोण आहे, हे तुम्हीच या फोटोंमध्ये बघा. गल्लीतलं भांडण विधिमंडळात नेणारेही हेच आहेत, ज्यांना केवळ माझे विरोधक आहेत म्हणून भाजपाने विविध पदे दिली. आता एवढी मोठी राजकीय ताकद पाठीशी असेल तर जामखेडमधील या गुंडांमध्ये भरदिवसा गोळ्या झाडून सामान्य माणसांचे मुडदे पाडण्याची हिंमत का येणार नाही? आणि जामखेडमध्ये गुंडगिरीला कोण पोसतंय? याचं उत्तर मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं, असे ते म्हणाले होते.

Leave a Comment

error: Content is protected !!