सेना-मनसे युतीवर शिक्कामोर्तब? संजय राऊतांचा मोठा दावा:कार्यकर्त्यांचं मनोमिलन, जागावाटप पूर्ण; केवळ एक औपचारिक घोषणा बाकी असल्याचे केले स्पष्ट

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना आणि मनसे युतीबाबत कोणत्याही प्रकारचा संभ्रम उरलेला नसल्याचे स्पष्ट करत, ही युती प्रत्यक्षात अस्तित्वात आल्याचा दावा त्यांनी केला. मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकत्रितपणे कामाला लागल्याचे त्यांनी सांगितले. दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये समन्वय आणि मनोमिलन झाल्याचे चित्र दिसत असल्याचे राऊत म्हणाले. संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, शिवसेना आणि मनसे यांच्यातील युती ही केवळ चर्चेपुरती मर्यादित नसून ती प्रत्यक्षात आकाराला आली आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर काल रात्री अंतिम तोडगा निघाला असल्याची माहिती त्यांनी दिली. यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षांची रणनिती आता स्पष्ट होत असल्याचे संकेत मिळत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये कोणताही गोंधळ नाही, सर्व स्तरावर समन्वय साधला जात असून संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू असल्याचेही त्यांनी नमूद केले. या संपूर्ण प्रक्रियेत आता केवळ एक औपचारिक घोषणा बाकी असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन युतीची अधिकृत घोषणा करायची असून, ती लवकरच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या घोषणेकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असून, सेना-मनसे युतीची औपचारिक घोषणा झाल्यानंतर मुंबईसह महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी हालचाल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वेळेत बोललो नाही, तर नंतर पश्चात्ताप करावा लागेल संजय राऊत यांनी भाजपवर आणि घटनात्मक संस्थांवर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्र आणि बिहारमधील निवडणूक निकाल ज्या पद्धतीने लावण्यात आले, त्यातून लोकशाहीचा गळा घोटला गेला असल्याचा आरोप त्यांनी केला. निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत सर्व घटनात्मक संस्था सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली चिरडल्या जात असल्याची भावना राऊत यांनी व्यक्त केली. वेळेत बोललो नाही, तर नंतर पश्चात्ताप करावा लागेल, असे सांगत त्यांनी सध्याच्या घडीला संघर्ष आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. आम्ही जिवंत आहोत, म्हणूनच लढतोय, असा ठाम संदेश त्यांनी दिला. त्यांनी केलेल्या पोस्टवर त्यांनी हे मत व्यक्त केले आहे. राऊत यांनी केलेली पोस्ट देखील पहा…. हमें बोलना चाहिये था…..! pic.twitter.com/f3W632VJCm— Sanjay Raut (@rautsanjay61) December 23, 2025 शिवसेना आणि मनसे यांच्यात युती, फक्त औपचारिक घोषणाच बाकी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीबाबत कोणताही संभ्रम उरलेला नसून, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते ही युती पूर्णपणे स्वीकारून कामाला लागले असल्याचं खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलं. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं की, युतीबाबतच्या स्पष्ट सूचना दोन्ही पक्षांकडून कार्यकर्त्यांना देण्यात आल्या असून, सध्या सर्व पातळीवर मनोमिलन झालं आहे. त्यामुळे शिवसेना आणि मनसे यांच्यात युती झालेली असून, आता फक्त औपचारिक घोषणाच बाकी असल्याचं त्यांनी नमूद केलं. रात्री उशिरापर्यंत जागावाटपाच्या चर्चांवर शेवटचा हात

संजय राऊत यांनी सांगितलं की, काल रात्री उशिरापर्यंत जागावाटपाच्या चर्चांवर शेवटचा हात फिरवण्यात आला आहे. आमच्यात जागावाटपावरून कोणताही वाद किंवा मतभेद नाहीत, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. नाशिक, पुणे, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मिरा-भाईंदर या महत्त्वाच्या शहरांमधील जागावाटपाचा विषय अंतिम टप्प्यात असून तो जवळपास निकाली निघालेला आहे. कार्यकर्त्यांमध्येही युतीबाबत सकारात्मक वातावरण असल्यामुळे महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही युती प्रभावी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीसोबत चर्चा, काँग्रेससाठी दरवाजे शेवटपर्यंत खुले राहतील युती कधी जाहीर होणार, याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, आज रात्री घोषणा करायची की उद्या, याचा निर्णय लवकरच घेतला जाईल. वरळीतील डोममध्ये जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले, त्याच क्षणी ही युती प्रत्यक्षात अस्तित्वात आली होती, असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसेच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर संभाव्य युतीबाबत आमदार जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काँग्रेसबाबत सध्या विषय थांबवण्यात आला असला, तरी संवादाचे दरवाजे शेवटपर्यंत खुले राहतील, असं सूचक विधानही संजय राऊत यांनी केलं.

Leave a Comment

error: Content is protected !!