Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

विरोधक सीरिअल लायर, रोज खोटे बोलतात:मुख्यमंत्र्यांचा सलग दुसऱ्या दिवशी घणाघात; महिला आरक्षण मिळेपर्यंत झोपू न देण्याचा इशारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी महिला आरक्षणाच्या मुद्यावरून विरोधकांवर घणाघात केला. महिला आरक्षणाच्या मुद्यावर विरोधक खोटा प्रचार करत आहेत. ते सीरियल लायर अर्थात अट्टल खोटारडे आहेत. महिलांना हक्काचे आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांना शांतपणे झोपू देणार नाही, असे ते म्हणालेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महिलांना लोकसभा व विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्यासाठी संसदेत नारी शक्ती वंदन विधेयक आणले गेले. पण हे विधेयक मंजूर होण्यासाठी आवश्यक बहुमत जमवता न आल्याने हे विधेयक लोकसभेत फेटाळले गेले. आता या मुद्यावरून भाजपने देशभरात रान पेटवले आहे. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या मुद्यावरून विरोधकांवर शरसंधान साधत आहेत. त्यांनी मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी युवाशक्ती जागर यात्रेला संबोधित करताना या प्रकरणी विरोधकांवर विशेषतः काँग्रेसवर टीकास्त्र डागले. मुख्यमंत्री म्हणाले, भारताच्या संसदेत विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयकाची भ्रूणहत्या केली. त्याचा आपल्याला जागर करण्याची आवश्यकता आहे. हे विरोधक सीरियल लायर अर्थात अट्टल खोटारडे आहेत. ते रोज खोटे बोलतात. महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये आले. ते पारित झाले. ते विधेयक केव्हा लागू झाले पाहिजे त्याची घटनादुरुस्ती सरकारने सादर केली होती. विरोधकांनी 2023 मध्ये या विधेयकाला तोंड दाबून पाठिंबा दिला होता. पण आता त्यांच्या लक्षात आले आहे की, एनडीएकडे दोन तृतीयांश बहुमत नाही. त्यामुळे त्यांनी आपले खरे दात दाखवण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांकडून नारीशक्ती, लोकशाहीचा अवमान विरोधकांनी संपूर्ण देशातील नारीशक्तीचा व लोकशाहीचा अपमान करण्याचे काम केले आहे. त्याचा जागर करण्याचे काम गरजेचे आहे. विरोधक सीमांकन, जनगणनेविषयी खोटे बोलत आहेत. या विधेयकाची वस्तुस्थिती व संविधानाने टाकलेली जबाबदारी काय आहे? हे अमित शहा यांनी संसदेत स्पष्ट केले. विरोधकांनी सूचवलेल्या सुधारणा एका तासात करण्याचा शब्दही दिला. पण त्यांना महिलांना आरक्षण द्यायचेच नव्हते. लोकसभेत महिला आरक्षण येऊ नये असा त्यांचा प्रयत्न आहे. या भारतात ज्या लोकांनी महिलांच्या उद्धारासाठी कार्य केले, त्या सर्वांना स्मरून सांगतो की, तुमच्या या मानसिकतेविरोधातील आमचा लढा सुरू झाला आहे. भारताच्या संसदेत व विधानसभांत जोपर्यंत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आम्ही तुम्हाला शांतपणे झोपू देणार नाही. आमचा तुमच्याविरोधातील संघर्ष सुरूच राहील. विरोधक कितीही खोटे बोलले तरी, खोट्याचे आयुष्य फार असत नाही आणि खरे कधी संपत नाही. त्यामुळे सत्य कधीही संपणार नाही हे मी स्पष्ट करतो, असे फडणवीस म्हणाले.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!