राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर होताच राजकीय वातावरणात महायुती आणि भाजपच्या विजयाची चर्चा सुरू झाली असली, तरी या निकालांमधून काँग्रेसच्या पराभवापेक्षा संघर्षाचीच अधिक चर्चा होताना दिसत आहे. एकीकडे भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवार गटाने मिळून अनेक ठिकाणी सत्ता हस्तगत केली असली, तरी दुसरीकडे सलग पराभवांच्या मालिकेत अडकलेल्या काँग्रेससाठी हे निकाल काही अंशी दिलासादायक ठरल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. 2014 नंतर सातत्याने निवडणुकांत अपयशाचा सामना करणाऱ्या काँग्रेसने या नगरपरिषद निवडणुकीत राज्यभरात आपली उपस्थिती अधोरेखित करत, पक्ष पूर्णपणे संपलेला नाही, हे दाखवून दिले आहे. त्यामुळे राजकीय विश्लेषक आणि कार्यकर्त्यांमध्ये भाजपच्या यशाइतकीच चर्चा काँग्रेसने मिळवलेल्या मर्यादित पण महत्त्वपूर्ण यशाची होताना दिसत आहे. या नगरपरिषद निवडणुकांमध्ये काँग्रेसने राज्यभरात नगराध्यक्ष पदाच्या एकूण 43 जागांवर विजय मिळवला असून नगरसेवक पदाच्या 1006 जागा जिंकल्या आहेत. सलग अनेक निवडणुकांमध्ये पराभवाचा सामना करत असलेल्या काँग्रेससाठी हा आकडा निश्चितच दुर्लक्षित करता येण्यासारखा नाही. या यशामुळे काँग्रेसची पराभवाची दीर्घ मालिका काही अंशी खंडित झाल्याचे मानले जात आहे. विदर्भात काँग्रेसला सर्वाधिक यश मिळाले असून या विभागात 23 नगराध्यक्ष पदांवर काँग्रेस किंवा काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विजयी झाले आहेत. मराठवाड्यात 5, पश्चिम महाराष्ट्रात 3, कोकणात 1 तर स्थानिक पातळीवरील काँग्रेस पुरस्कृत आघाड्यांना 7 ठिकाणी यश मिळाले आहे. हे यश महायुतीच्या तुलनेत संख्येने कमी असले, तरी काँग्रेससाठी राजकीय पुनरुज्जीवनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहे. या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली. महाविकास आघाडीतील अनेक बडे नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रचारापासून दूर असताना, सपकाळ यांनी मात्र एकाकीपणे संपूर्ण राज्यभर प्रचाराची धुरा सांभाळली. विशेष म्हणजे त्यांनी प्रचारासाठी हेलिकॉप्टरचा वापर टाळत, जमिनीवर उतरून जनतेशी थेट संवाद साधण्यावर भर दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी या काळात राज्यभरात 64 जाहीर सभा आणि 22 बैठका घेतल्या. काही ठिकाणी काँग्रेसने स्वबळावर उमेदवार उभे केले, तर काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना पाठिंबा देत पुरस्कृत उमेदवारांच्या माध्यमातून निवडणूक लढवली. हे यश म्हणजे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे आणि तळागाळातील संघटनेच्या ताकदीचे प्रतिक असल्याचे सपकाळ यांनी स्पष्ट केले आहे. हार कर भी जो जीता है, उसे बाजीगर कहते है निवडणूक निकालांनंतर प्रतिक्रिया देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसची भूमिका ठामपणे मांडली. हार कर भी जो जीता है, उसे बाजीगर कहते है, या शब्दांत त्यांनी काँग्रेसचा संघर्ष अधोरेखित केला. भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट ज्या पद्धतीने सत्ता मिळवत आहेत, त्या मार्गाने काँग्रेसला सत्ता नको असल्याचे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आम्हाला सत्तेपेक्षा सत्य आणि जनतेच्या मनातील विश्वासाची सत्ता महत्त्वाची आहे, असे सांगत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांमध्येही काँग्रेस याच विचारधारेवर ठाम राहून लढेल, असा इशाराही त्यांनी दिला. बचेंगे तो और भी लढेंगे…! असा सूचक नारा त्यांनी दिला.
