विमानापेक्षा इमान महत्त्वाचं!:उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर आणि फडणवीसांसह विमानप्रवासावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापले आहे. फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात जाऊन उद्धव ठाकरे जाहीर सभा घेत असताना, त्यावर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रायगडावरून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या विमानप्रवासापर्यंत विविध मुद्द्यांवर शिंदे यांनी टोलेबाजी केली. ‘जाहीर सभा घ्यायला मीच त्यांना कामाला लावलं’ उद्धव ठाकरे फुटलेल्या खासदारांच्या मतदारसंघात सभा घेत असल्याबाबत विचारले असता शिंदे म्हणाले, “काय बोलणार मी? जाहीर सभा घ्यायला मीच त्यांना लावलं आहे. मी सगळ्यांना कामाला लावलं आहे.” यानंतर त्यांनी खोचक शब्दांत टीका करत म्हटले, “ही तर वरातीमागून घोडे अशी परिस्थिती आहे. सगळे जण निघून गेल्यावर आता हे पोहोचत आहेत. त्याचा काय उपयोग? ‘जो हौद से गया, वो बूंद से नहीं आता’,” असा टोला त्यांनी लगावला. शिवसेनेतील सहा खासदार शिंदे गटात दाखल झाल्यानंतर उद्धव ठाकरे त्यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. मुंबईनंतर त्यांनी यवतमाळमध्ये सभा घेतली असून, पुढे इतर मतदारसंघांचाही दौरा नियोजित आहे. ‘विमानापेक्षा इमान महत्त्वाचं’ उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला जाताना एकाच विमानातून प्रवास केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले, “विमानापेक्षा इमान महत्त्वाचं असतं.” ते पुढे म्हणाले, “2019 मध्ये महाराष्ट्रातील जनतेने एकाच विमानातून प्रवास करण्यासाठी आम्हाला तिकीट दिलं होतं. पण त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या बुडत्या जहाजात बसण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज जे काही घडत आहे, त्याची सुरुवात तेव्हाच झाली होती.” ‘देवेंद्रजींनी कपटी मित्र किती घातक असतो हे अनुभवलंय’ 2019 च्या राजकीय घडामोडींचा संदर्भ देत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा निशाणा साधला. “देवेंद्र फडणवीस खूप हुशार आहेत. 2019 मध्ये कपटी मित्र किती घातक असतो, याचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्यामुळे यावर मला आणखी काही बोलण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले. रायगडच्या पालकमंत्रिपदावर लवकरच निर्णय रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही शिंदे यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून रायगडावर आलो आहोत. छत्रपतींच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय लवकरच जाहीर होईल.” दरम्यान, रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी मंत्री भरत गोगावले यांचे नाव चर्चेत असून, त्यांनाच ही जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवराज्याभिषेक सोहळ्याचे महत्त्व अधोरेखित रायगडावरील तिथीनुसार आयोजित शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत बोलताना शिंदे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त रायगडावर शिवभक्त आणि मावळ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आहे. प्रत्येकाने शिवरायांकडून प्रेरणा घ्यावी, त्यांचे गुण अंगीकारावेत, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.” दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभांमुळे आणि शिंदे यांच्या या प्रत्युत्तरामुळे शिवसेनेतील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे चित्र दिसत आहे. 2019 च्या घटनांचा संदर्भ देत दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच असून, आगामी काळात हा संघर्ष आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!