मालेगावात उपमहापौरांच्या दालनात वादग्रस्त छायाचित्र प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. उपमहापौर शान-ए-हिंद निहाद अहमद यांनी दालनाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर टिपू सुलतान यांचा फोटो पुन्हा लावण्यात येईल, असे स्पष्टपणे सांगितले आहे. स्वागत समारंभात केलेल्या या वक्तव्यामुळे मालेगावातील राजकीय आणि सामाजिक वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. यापूर्वी प्रशासनाने तणाव टाळण्यासाठी फोटो काढला होता. मात्र आता उपमहापौरांच्या नव्या भूमिकेमुळे वादाला नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मालेगाव शहरातील किल्ला परिसरात आयोजित स्वागत कार्यक्रमात बोलताना शान-ए-हिंद यांनी आपली भूमिका ठाम असल्याचे सांगितले. इंग्रजांविरोधात लढणाऱ्या योद्ध्याचा फोटो लावण्यात चुकीचे काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. देशभरात टिपू सुलतान यांच्या संदर्भात विविध मतमतांतरे सुरू असतानाच उपमहापौरांनी केलेले हे दुसरे विधान विशेष लक्षवेधी ठरले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे स्थानिक पातळीवर पुन्हा चर्चा सुरू झाली असून, पुढील काही दिवसांत राजकीय घडामोडी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नव्या महापौर आणि उपमहापौरांनी पदभार स्वीकारताच हे प्रकरण उफाळून आले होते. महापौरपदी नसरीन बानो खालिद शेख यांची निवड झाली, तर उपमहापौरपदी शान-ए-हिंद यांची निवड जाहीर झाली. पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचे छायाचित्र लावण्यात आले आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. शहरात विविध राजकीय पक्षांनी यावर प्रतिक्रिया देत प्रशासनाकडे तक्रारी केल्या. या प्रकरणाला वेग आला तो सोशल मीडियामुळे. उपमहापौरांच्या दालनातील छायाचित्राचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. त्यानंतर विविध राजकीय पक्ष, हिंदुत्ववादी संघटना आणि काही नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासन सतर्क झाले. चर्चेचा विषय केवळ स्थानिक पातळीपुरता मर्यादित न राहता व्यापक राजकीय पटलावरही गेला. या मुद्द्यावर शिंदेंची शिवसेना आक्रमक झाली होती. शिवसेनेचे नगरसेवक थेट आयुक्त कार्यालयात गेले आणि उपमहापौरांच्या दालनातील फोटो तात्काळ हटवावा, अन्यथा आंदोलन तीव्र करू, असा इशारा दिला. हिंदुत्ववादी संघटनांनीही या कृतीचा निषेध नोंदवला. काही नगरसेवकांनी नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप केला. वाढता तणाव लक्षात घेता नगरसचिवांनी हस्तक्षेप करत वाद टाळण्यासाठी संबंधित फोटो हटवण्याचे आदेश दिले. प्रशासनाच्या या निर्णयानंतर परिस्थिती काहीशी शांत झाली होती. वाद पुन्हा पेटण्याची शक्यता मात्र, आता उपमहापौरांनी दालन दुरुस्तीनंतर फोटो पुन्हा लावण्याचे जाहीर केल्याने वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. काहींनी त्यांच्या भूमिकेचे समर्थन केले, तर काहींनी पुन्हा आंदोलनाची भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत. शहरात शांतता राखण्यासाठी प्रशासनाने योग्य पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत. एकूणच, टिपू सुलतान छायाचित्र प्रकरणाने मालेगावातील राजकारणाला पुन्हा एकदा उकळी आणली आहे. आधी हटवण्यात आलेला फोटो दालनात पुन्हा लावण्याच्या उपमहापौरांच्या घोषणेमुळे पुढील काळात वातावरण आणखी तापण्याची शक्यता नाकारता येत नाही. राजकीय पक्ष, संघटना आणि प्रशासन या सर्वांच्या भूमिकांकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शहरात शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान ठरणार आहे.
