पुढील 25 वर्षे महाविकास आघाडीच झळकत राहील अशा पोकळ घोषणा करणाऱ्या मविआचे आता राजकीय विसर्जन झाल्याचा दावा भाजपने केला आहे. महाविकास आघाडीला ना विचारधारा होती, ना दिशा, ना भविष्यदृष्टी. फक्त भाजप विरोध हा एकमेव धागा धरून एकत्र आलेले स्वार्थी पक्ष फार काळ टिकत नाहीत हे या निमित्ताने पुन्हा सिद्ध झाले, असे भाजपने म्हटले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे बिनसले आहे. मनसेला सोबत घेण्याच्या मुद्यावरून काँग्रेसने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारीही सुरू केली आहे. दुसरीकडे, शरद पवार गट व ठाकरे गटातील जागावाटपाचा तिढा अजून सुटला नाही. मुंबईतील ही स्थिती राज्यातील इतरही बहुतांश महापालिकांमध्ये दिसून येत आहे. विशेषतः पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचे मनोमिलन होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपने महाविकास आघाडी नावाची एक फसवी एकजूट इतिहासजमा झाल्याचा दावा केला आहे. तीन पक्षांची तोंडे तीन वेगवेगळ्या दिशांना भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये याविषयी म्हणाले, महापालिका निवडणुकांचे अर्ज भरायला सुरुवातही झालेली नाही, तोवरच एक मोठा निकाल लागला आहे. “पुढील 25 वर्षे मविआ झळकत राहील” अशा पोकळ घोषणा करणाऱ्या मविआचे आता राजकीय विसर्जन झाले आहे. मविआतील तीन पक्षांची तोंडे आता तीन वेगवेगळ्या दिशांना फिरली आहेत.
उबाठा आणि काँग्रेस वेगळे लढणार, शरद पवार गट राष्ट्रवादीसोबत जाणार, म्हणजेच मविआ नावाची फसवी एकजूट आता इतिहासजमा झाली आहे. हे होणारच होते. कारण या आघाडीला ना विचारधारा होती, ना दिशा, ना भविष्यदृष्टी. फक्त “भाजपा विरोध” हा एकमेव धागा धरून एकत्र आलेले स्वार्थी पक्ष फार काळ टिकू शकत नाहीत, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. सत्तेची लालसा असलेली युती जनतेच्या कसोटीवर कधीच उतरू शकत नाही. आणि मविआ त्याचे जिवंत उदाहरण ठरली आहे, असे त्यांनी म्हटले आहे. ठाकरे बंधूंच्या युतीमुळे अनेक कार्यकर्ते भाजपत केशव उपाध्ये यांनी नाशिकमध्ये ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर ढोल पिटणारे कार्यकर्ते दुसऱ्याच दिवशी भाजपत गेल्याचाही दावा केला आहे. ते म्हणाले, नाशिकमध्ये “ठाकरे बंधू एकत्र” आल्यावर ढोल पिटणारे कार्यकर्ते अवघ्या दुसऱ्याच दिवशी भाजपात सामील होतात तेव्हा त्यावर संजय राऊत दुःख व्यक्त करत नैतिकतेचे प्रश्न विचारतात, हा सरत्या वर्षांतील सर्वात मोठा राजकीय विनोद म्हणावा लागेल. राजकारणात कार्यकर्त्यांसमोर नैतिकतेचा आदर्श नेत्यांनीच ठेवायचा असतो. पण तो आदर्श केव्हाच उद्ध्वस्त झाला. 28 नोव्हेंबर 2019 रोजी, मुख्यमंत्रीपदाच्या मोहापोटी, उद्धव ठाकरे यांनी कोणताही वैचारिक विधीनिषेध न पाळता, क्षणार्धात भूमिका बदलत काँग्रेससोबत आघाडी केली. त्या दिवशी केवळ सत्ता-समीकरण बदलले नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील मूल्यांची घसरण सुरू झाली… आणि नैतिकता थेट रसातळाला गेली. ज्या नेतृत्वाने स्वतः विचार, भूमिका आणि शब्द यांची किंमत शून्यावर आणली, ते आज कार्यकर्त्यांना नैतिकतेचे धडे देत आहेत… हा दुटप्पीपणाचा कळस आहे. नेतेच जर संधीसाधूपणाचे प्रतीक बनले असतील, तर कार्यकर्त्यांकडून निष्ठेची अपेक्षा तरी कोणत्या तोंडाने करणार? आज जे घडते आहे ते अचानक नाही; ते 2019 मध्ये पेरलेल्या संधीसाधू राजकारणाचेच पीक आहे. नैतिकतेवर प्रश्न विचारण्याचा अधिकार ज्यांनी आधी गमावला आहे, त्यांनी उपदेश करण्यापेक्षा आत्मपरीक्षण करणे अधिक योग्य ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
