अजितदादांनी रोखलेले राजीनामे मृत्यूनंतर मंजूर:NCP मध्ये नेमकं काय सुरू? निर्णय त्वरित का घेतला; तटकरेंविरोधात नाराजीचा स्फोट

अजित पवार हयात असताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक सेलच्या प्रदेशाध्यक्षांनी आपले राजीनामे सादर केले होते, अशी माहिती समोर आली आहे. 26 जानेवारी रोजी पुण्यात त्यांनी हे राजीनामे थेट अजित पवार यांच्याकडे दिले होते. मात्र त्या वेळी हे राजीनामे स्वीकारण्यात आले नव्हते. आता त्यांच्या अपघाती निधनानंतर पक्षाने कोणतीही कारणे न विचारता हे सर्व राजीनामे मंजूर केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पक्षांतर्गत नाराजीचे पडसाद या निर्णयातून उमटल्याचे बोलले जात आहे. राजीनामा देणाऱ्यांमध्ये मनोज व्यवहारे (असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्ष), सुभाष मालपाणी (उद्योग विभाग प्रदेशाध्यक्ष) आणि सचिन जाधव (मोटार मालक वाहतूक संघटना प्रदेशाध्यक्ष) यांचा समावेश आहे. या तिघांनी 26 जानेवारी रोजी लेखी पत्र देत आपल्या पदाचा राजीनामा सादर केला होता. त्या दिवशी अजित पवार पालकमंत्री म्हणून पक्ष कार्यालयात गेले होते आणि त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या ध्वजारोहण कार्यक्रमालाही उपस्थित होते. त्याच दिवशी या पदाधिकाऱ्यांनी पक्ष कार्यालयात जाऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, या तिन्ही नेत्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी होती. वरिष्ठांकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची भावना त्यांनी व्यक्त केली होती. संघटनात्मक स्तरावर असमानता आणि न्यायाच्या तत्वांचा अभाव असल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले होते. वरिष्ठांकडून असहकार्याची भूमिका घेतली जात असल्याने संघटनावाढीला अडथळे येत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर जबाबदार पदावर राहणे कठीण होत असल्याचे सांगत त्यांनी पद आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्या वेळी अजित पवार यांनी हे राजीनामे स्वीकारले नव्हते, अशी माहिती समोर येते. मात्र त्यांच्या अपघाती निधनानंतर हेच राजीनामे प्रदेश कार्यालयात पोहोचले आणि कोणतीही कारणमीमांसा न करता ते मंजूर करण्यात आले. त्यामुळे पक्षात अचानक झालेल्या या बदलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ज्या निर्णयाला दादांनी स्थगिती दिली होती, तो निर्णय त्यांच्या अनुपस्थितीत त्वरित का घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राजीनामा पत्रातील मजकूरही सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लोकशाहीवादी पक्षात संघटनात्मक असमानता, न्यायिक तत्वांचा अभाव आणि वरिष्ठांकडून असहकार्य यामुळे भविष्यात हानी टाळण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते. आज भारतीय प्रजासत्ताक दिनी पक्षातील जबाबदारीला पूर्णविराम देत आहे, असेही त्यात लिहिले होते. तसेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञताही व्यक्त केली होती. सुनील तटकरे पुढील निर्णय काय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे आता या सर्व घडामोडीनंतर संबंधित विभागांसाठी नवीन नियुक्त्या कोणाच्या नावावर होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे पुढील निर्णय काय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षात होत असलेल्या बदलांमुळे संघटनात्मक पातळीवर नवे समीकरण तयार होणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्वस्थता असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!