कर्नाटकच्या आडमुठ भूमिकेमुळे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी पाण्यापासून वंचित राहत आहेत. उजनी धरण येथून सोडलेले पाणी भीमा नदीवरील उमराणी गावाजवळ उभारलेल्या नव्या बंधाऱ्यात अडवले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या अडवणुकीमुळे दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेकडो हेक्टर शेती धोक्यात आली आहे. उमराणी येथे सुमारे एक टीएमसी पाणी रोखल्याने महाराष्ट्रातील नऊ गावांना थेट फटका बसत आहे. नदीचा प्रवाह खाली पोहोचत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले असून परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. सहा फेब्रुवारी रोजी उजनी धरणातून भीमा नदीत सुमारे चार हजार चारशे क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. मात्र, हे पाणी उमराणी बंधाऱ्यात अडवले गेल्याने खालील भागात पोहोचलेच नाही. परिणामी लवंगी, पाटीलनगर, कारकल, औज, कुरघोट, टाकळी, बरूर आणि चिंचपूर या गावांतील पिकांना पाण्याचा पुरवठा थांबला आहे. भीमा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उभ्या पिकांवर संकट आले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. पाण्याअभावी शेतीचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पाणीअभावी परिस्थितीचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित नाही. मंद्रूपसह आठ गावांच्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठाही बंद पडला आहे. ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी पर्याय शोधावे लागत आहेत. याबाबत प्रशासनाकडे विचारणा केल्यावर सरकारकडे बोट दाखवले जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधी आणि शेतकरी करत आहेत. मंद्रूप आणि परिसरातील शेतकऱ्यांनी जिल्हा प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींना निवेदन देऊन तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली आहे. मात्र, अद्याप उमराणी बंधाऱ्यातून पाणी खाली सोडण्यात आलेले नसल्याने गावकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे. कर्नाटक सरकार हुकूमशाही वागत असल्याचा आरोप दरम्यान, सोलापुरातील लोकप्रतिनिधीही या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. कर्नाटकने उजनीचे पाणी अडवल्यानंतर प्रशासनाने पुढील पाणी सोडणे थांबवले आहे. त्यामुळे सादेपूरखालील गावांमधून मोठ्या प्रमाणावर तक्रारी येऊ लागल्या आहेत. शेतकरी आणि ग्रामस्थांनी हा विषय अधिवेशनात मांडून न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी आपल्या प्रतिनिधींना केली आहे. कर्नाटक सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी होत आहे. दोन्ही राज्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती आहे. खाली पाणी सोडण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. तरीही, जोपर्यंत उमराणी बंधाऱ्यातील पाणी खाली सोडले जात नाही, तोपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांचे प्रश्न सुटणार नाहीत. या संपूर्ण प्रकरणाकडे दोन्ही राज्यांनी गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे
