मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी जागावाटपाचा तिढा सुटत असतानाच, महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या ‘रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया’आठवले गटाने बंडाचे निशाण फडकवले आहे. “भाजप आणि शिवसेनेने (शिंदे गट) आमच्याशी विश्वासघात केला आहे,” असा घणाघाती आरोप करत रामदास आठवले यांनी मुंबईत स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली. रिपाईने आज 39 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली असून, मुंबईत दलित मतांच्या विभाजनामुळे भाजप-शिंदे सेनेची डोकेदुखी वाढणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महायुतीच्या नेत्यांनी रिपाइंला ७ जागा देण्याचे आश्वासन दिले होते. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री स्तरावर चर्चाही झाली होती. मात्र, भाजपने 137 आणि शिवसेनेने 90जागांची घोषणा केली, पण या यादीत रिपाईच्या एकाही उमेदवाराचे नाव समाविष्ट करण्यात आले नाही. अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतानाही महायुतीकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने रामदास आठवले यांनी आक्रमक पवित्रा घेत, आपल्या पक्षाच्या 39 उमेदवारांची यादी जाहीर केली. का वाढणार महायुतीची डोकेदुखी? मुंबईतील अनेक वॉर्डांमध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत. विशेषतः ईशान्य मुंबई, उत्तर-मध्य मुंबई आणि चेंबूर-भांडुप पट्ट्यात रिपाइंला मानणारा मोठा वर्ग आहे. आजवर ही मते महायुतीच्या पारड्यात पडत होती. मात्र, आता रिपाईने 39 उमेदवार मैदानात उतरवल्यामुळे दलित मतांचे विभाजन अटळ आहे. मुंबईच्या निवडणुकीत जिथे 100-200 मतेही जय-पराजयाचे गणित बदलू शकतात, तिथे रिपाइंचा हा ‘स्वबळ’ पॅटर्न भाजप-सेनेसाठी धोक्याची घंटा ठरणार असल्याचे बोलले जात आहे. आता मागे हटणार नाही – रामदास आठवले प्रसारमाध्यमांशी बोलताना आठवले म्हणाले की, “आम्ही शेवटपर्यंत संयम राखला. 7 जागांची आमची माफक मागणी होती, पण आम्हाला झुलवत ठेवण्यात आले. आमच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप आहे. त्यामुळेच आम्ही मुंबईच्या अस्मितेसाठी आणि आमच्या हक्कासाठी 39 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे.”
रिपाइं आठवले गटाची मुंबईतील उमेदवारांची यादी
