न्यू तापडियानगर रेल्वे उड्डाण पुलासाठी न्यायालयात याचिका:पुलाचे काम रखडल्याने परिसरातील रहिवाशांच्या वतीने ॲड. नरेंद्र बेलसरे यांनी जनहित याचिका केली दाखल‎

न्यू तापडिया नगरातील रखडलेल्या रेल्वे उड्डाण पुलासाठी आता परिसरातील नागरिकांनी न्यायालयीन लढ्याचा बिगुल वाजवला आहे. उड्डाणपुलाच्या प्रलंबित बांधकाम प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. परिसरात राहणारे सामाजिक कार्यकर्ते नरेंद्र बेलसरे यांनी ही याचिका दाखल केली आहे. रस्त्यावरील लढाई आता कोर्टातपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. न्यू तापडिया नगर गेट क्रमांक ३८ येथे उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरू आहे. एवढेच नव्हे तर या भागात राहणाऱ्या हजारो नागरिकांना सात वर्षापासून मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. उड्डाणपुलाच्या कामाच्या नावाखाली या भागात तीन चाकी व चार चाकी वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना, लहान मुलांना तसेच वैद्यकीय उपचार घेणाऱ्या लोकांना याचा फटका बसत आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात रेल्वे वाहतूक असून दर पंधरा मिनिटानंतर गेट बंद राहते. अनेक वेळा वाद होतात. उर्वरित पान ४ या भागातील नागरिकांना त्रास रेल्वे गेट परिसरातून दररोज हजारो नागरिक शहरात येतात आणि जातात. न्यू तापडिया नगर, पंचशील नगर, दमानी हॉस्पिटल, बापू नगर, शंकर नगर, क्रांती चौक, खरप, घुसर आपोती खुर्द आपातापा म्हैसांग या भागातील हजारो नागरिकांना शासनाच्या या दप्तर दिरंगाईचा फटका बसत आहे. हा उड्डाणपूल मुंबई- हावडा व अकोला- नांदेड या दोन रेल्वे लाइनवर असून उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूंनी काम अर्धवट स्थितीत पडलेले आहे. या जनहित याचिकेमध्ये महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, केंद्रीय रेल्वे मंत्रालय, महानगरपालिका आयुक्त अकोला आणि भुसावळ विभागाचे विभागीय रेल्वे प्रबंधक यांना प्रतिवादी करण्यात आले आहे, असे अॅड. बेलसरे यांनी कळवले आहे. जनहित याचिकेमध्ये मांडले काही महत्त्वाचे मुद्दे न्यू तापडिया नगर भागात विकास कामांना खीळ. सतत गेट बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान. वेळेवर वैद्यकीय उपचार न मिळाल्याने अनेकांचा जीव गेला. वीज नसल्यामुळे गुंडा गर्दीचे प्रमाण वाढले. मोठ्या प्रमाणात झुडपे वाढल्यामुळे वन्य प्राण्यांची भीती बळावली. वाहनधारकांना पडतो दहा किलोमीटरचा फेरा. रस्ते वीज आणि पाणी ही समस्या कायम आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!