मुंबईत रिपाइंला एकही जागा नाही:केंद्रीय मंत्री रामदास आठवले संतापले; भाजप – शिंदे गटावर विश्वासघाताचा आरोप अन् इशारा

सत्ताधारी भाजप व शिवसेनेने मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपाइं (आ.) एकही जागा सोडली नाही. यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले चांगलेच संतापलेत. महायुतीने आमच्यासोबत विश्वासघात केला. आम्ही हा अपमान कदापि सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी या प्रकरणी त्यांनी भाजप व शिवसेनेला दिला आहे. मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. भाजप व शिंदे गटाचे सोमवारी जागावाटप निश्चित करण्यात आले. त्यानुसार, मुंबईत भाजप सर्वाधिक 137 व शिंदे गट 90 जागांवर लढणार आहे. या जागावाटपात रिपाइंने महायुतीकडे 16 जागांची मागणी केली होती. पण भाजप व शिंदे गटाने त्यांना योग्य तो मान राखण्याचा शब्द देत शेवटपर्यंत झुलवत ठरले. यावर रामदास आठवले यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी रामदास आठवले यांची त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. प्रवीण दरेकरांनीही रामदास आठवलेंना मुंबईत रिपाइंला सन्मानकारक जागा सोडण्याचा शब्द दिला होता. पण आता शिवसेना – भाजपच्या प्रत्यक्ष जागावाटपात रिपाइंला एकही जागा सोडण्यात आली. यामुळे आठवले चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी आपला संताप एका पोस्टद्वारे व्यक्त केला. हा निव्वळ विश्वासघात – रामदास आठवले रामदास आठवले म्हणाले, महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत. मात्र, आज जागावाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे, तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी काल दुपारी चार वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, मित्रपक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आले नाही. हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही. त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून, आज दुपारी पक्षाचा अंतिम निर्णय आणि भूमिका अधिकृतपणे जाहीर केला जाईल, असे रामदास आठवले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. संभाजीनगरात युतीचा पोपट मेला दुसरीकडे, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप – शिवसेनेची युती तुटली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी ही युती तुटल्याची घोषणा केली. संभाजीनगरमध्ये युती व्हावी, यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः प्रयत्न केले. स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या. पण सुरुवातीपासूनच भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांची भूमिका वेगळी असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे शंका निर्माण झाल्या होत्या. मी सातत्याने स्थानिक नेत्यांच्या संपर्कात होतो. त्यांच्याशी फोनवरून चर्चा केल्या. देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू मानले जाणारे चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतही बैठक झाली. शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसमोर जागावाटप ठरले होते. त्यामुळे त्यावेळी युती झाली, अशाच संभ्रमात आम्ही होतो. मात्र प्रत्यक्ष जागा देण्याची वेळ आली, तेव्हा शिवसेनेच्याच जागा सोडाव्यात, असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात आला. ही भूमिका आमच्या कार्यकर्त्यांना कदापि मान्य होणारी नव्हती. त्यामुळे आम्ही आमच्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे शिरसाट म्हणाले.

Leave a Comment

error: Content is protected !!