मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची लोकशाही गुंडाळण्याचा खेळ सुरू केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ केला आहे. नगरपालिका निवडणुकीत पैशांचा अमाप वापर झाला. आज मनपा निवडणुकीत तोच कित्ता गिरवला जात आहे. भाजप व त्याचे मित्रपक्ष अधिक बेशरम स्वरुपाचे चारित्र्य घेऊन निवडणुकीत उतरलेत. त्यांनी निवडणुकीपूर्वीच घोडेबाजार मांडला आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी संविधानाच्या छातीत सुरा खूपसल्याचाही आरोप केला. हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकारांना संबोधित केले. त्यात ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राची लोकशाही गुंडाळण्याचा खेळ सुरू केला आहे. नगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी तमाशा मांडला होता. त्यात पैसा फेक, तमाशा देख हा वग होता. आता शहरी भागात महापालिका निवडणुकीत त्यांनी केवळ वगाचे नाव बदलले आहे. तमाशा तसाच सुरू आहे. पण बाप बडा ना भैया, सबसे बडा रुपय्या हा नवा वग त्यांनी आणला आहे. निवडणुका हा लोकशाहीचा सण आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या सद्सद्विवेक बुद्धीने मतदान करावे. हे संविधानाने दिलेला त्यांचा अधिकार आहे. भाजपने वग बदलला, पण तमाशा कायम सपकाळ म्हणाले, राजकीय पक्षांनी त्यांचा जाहीरनामा लोकांपुढे मांडायचा. त्यानंतर मतांचा जोगवा मागायचा. त्यानंतर सर्वाधिक मते ज्याला मिळतील तो माणूस विजयी होतो. त्यानंतर एकमेकांच्या हातात हात घालून पुढच्या कामाला लागायचे ही आजवरची परंपरा व संस्कार आहे. राजकीय पक्षांकडून अशा वर्तनाची अपेक्षा आहे. पण आता आपली ही परंपरा व संस्कृती गुंडाळून ठेवली जात आहे. गावगाडा चालवत असताना केवळ राजकीय पक्ष म्हणून पुढे जाता येत नाही. सर्व स्थानिकांना सोबत घेऊन व त्यांची मोट बांधूनच पुढे जावे लागते. पंचायत राज व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या स्वरुपाला सध्या काळे फासले जात आहे. यांची सत्तेची भूक आता लोकशाही गिळंकृत करण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. त्यामुळे लोकशाहीला वाचवण्यासाठी काँग्रेस लोकांच्या सद्सद्विवेकबुद्धीला हाक देत आहे. ते पुढे म्हणाले, नगरपालिका निवडणुकीत पैशांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. आज त्याचाच कित्ता गिरवला जात आहे. भाजप व त्याचे मित्रपक्ष आता अधिक बेशरम स्वरुपाचे चारित्र्य घेऊन मनपा निवडणुकीत उतरलेत. लोकशाही विरोधात घोडेबाजार नावाचा शब्द वापरला जातो. निवडून आल्यानंतर घोडेबाजार मांडला जातो असे मानले जाते. पण यावेळी घोडेबाजार निवडून येण्याच्या अगोदरच माजला आहे. आम्ही भाजप व त्याच्या मित्र पक्षांच्या कृत्याचा तीव्र निषेध करतो. बिनविरोध निवडीवरही सडकून टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या मुद्यावरूनही सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, बिनविरोध निवड ही आपोआप झाली नाही. एखादा उमेदवार फार लोकप्रिय आहे म्हणून त्याची बिनविरोध निवडणूक झाली नाही. यासाठी मोठ्या प्रमाणात धाकधपट व पैसा वापरण्यात आला. या सर्व खेळाचा मूक साक्षीदार निवडणूक आयोग आहे. व्यवस्था देखील या गुंडागर्दीमध्ये सत्ताधाऱ्यांना मदत करत आहे. त्यामुळे आपण वेळीच सावध झालो नाही, तर काळ आपल्याला माफ करणार नाही अशी साद काँग्रेस सर्वसामान्य जनतेला घालत आहे. बिनविरोध निवडणूक झाल्या असल्या तरी नोटांचा पर्याय अबाधित आहे. ज्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली त्या ठिकाणी नोटाचा पर्याय उपलब्ध असणारी ईव्हीएम ठेवून मतदान घ्यावे. लोकांनी नोटावर मतदान करून आपला निषेध नोंदवावा, असे ते म्हणाले. राहुल नार्वेकर संविधानाचे मारेकरी हर्षवर्धन सपकाळ म्हणाले, देशात व राज्यात घटनात्मक प्रक्रियेला काळीमा फासण्याचे काम अनेक पातळीवर झाले. पण देशाचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, विधानसभा व विधानपरिषदेचे सभापती याकडे दुर्लक्ष करत आहेत. हे कोणत्याही एका पक्षाचे नसतात. त्यांनी संविधानाचे संरक्षणकर्ते म्हणून आपले कर्तव्य पार पडले पाहिजे. पण राहुल नार्वेकर यांनी महाराष्ट्राची संस्कृती बुडवण्याचे काम केले. त्यांचे कर्तृ्व केवळ भाजपसाठी पोषक आहे. त्यांचे करंटेपण हे कायमस्वरुपी त्यांच्या कपाळावर गोंदले गेले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातील हे एक काळे पान आहे. राहुल नार्वेकरांनी पहिल्या कार्यकाळात सत्ताधाऱ्यांना मदत केली. त्यांनी संविधानाच्या अनुसूची दहाच्या माध्यमातून संविधानाच्या छातीत सूरा खूपसण्याचे काम केले. अनुसूची 10 चा मर्डर केला. त्याचे बक्षीस म्हणून त्यांना दुसऱ्यांदा विधानसभेच्या अध्यक्षपदी संधी देण्यात आली. हा भाजपचा अत्यंत बेशरमपणा व क्रूरपणा आहे. आता हेच राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला फासावर चढवण्याचे काम सर्वांच्या साक्षीने करत आहेत. आम्ही या प्रकरणी आयोगाकडे तक्रार दाखल केली. आयोगाने सर्व ऐकूण घेतल्यानंतर आम्हालाच पुरावे सादर करण्याची सूचना केली. निवडणूक आयोगाला लाज वाटली पाहिजे. सर्वकाही उघडे असताना आयोगाने ही मागणी केली, असेही हर्षवर्धन सपकाळ यावेळी बोलताना म्हणाले. यावेळी त्यांनी नार्वेकरांवर गुन्हा दाखल करण्याचीही मागणी केली.