खाकी वर्दीतला अधिकारी की संघाचा प्रचारक?:विश्वास नांगरे पाटलांवरून काँग्रेसने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले ‘हे’ 6 प्रश्न!

नागपूरचे नवनियुक्त पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात हजेरी लावत संघाचे आणि डॉ. हेडगेवार यांचे गौरवगान केले होते. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने तीव्र आक्षेप नोंदवला असून, थेट राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. “विश्वास नांगरे पाटील यांनी संविधानापेक्षा संघाला मोठे मानले का? ते संविधानाचे अधिकारी म्हणून बोलत होते की विशिष्ट विचारधारेचे प्रतिनिधी म्हणून?” असा संतप्त सवाल करत काँग्रेसने सरकारला प्रशासकीय आणि कायदेशीर नियमांचा (All India Services Conduct Rules) हवाला देत थेट 6 प्रश्न विचारले आहेत. 1. पूर्वपरवानगी घेतली होती का? (Rule 13(2)(f)(iii) चे उल्लंघन?) नियम काय सांगतो: ‘ऑल इंडिया सर्व्हिसेस (कंडक्ट) रुल्स, 1968’ नुसार आयपीएस अधिकाऱ्याला अशा सार्वजनिक किंवा खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सरकारची पूर्वपरवानगी आवश्यक असते. काँग्रेसचा सवाल: विश्वास नांगरे पाटील यांनी या कार्यक्रमासाठी गृह विभाग किंवा राज्य सरकारची पूर्वपरवानगी घेतली होती का? जर घेतली असेल, तर त्याची प्रत सार्वजनिक करणार का? आणि जर परवानगी नसेल, तर नियमांच्या संभाव्य उल्लंघनाबद्दल सरकार त्यांच्यावर काय कारवाई करणार आहे? 2. पदाला न शोभणारे वर्तन (Rule 3(1) ची पायमल्ली?) नियम काय सांगतो: अधिकाऱ्याने असे कोणतेही वर्तन करू नये जे त्याच्या पदाला शोभणारे नाही. काँग्रेसचा सवाल: पोलीस दलातील अधिकारी हा कायद्याचा रक्षक असतो, विचारधारेचा प्रचारक नाही. एका विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन तिचे उदात्तीकरण करणे हे एका आयपीएस अधिकाऱ्याला शोभते का? 3. राजकीय तटस्थता की राजकीय निष्ठा? (Rule 3(1A)(ii)) नियम काय सांगतो: राजकीय तटस्थता (Political Neutrality) हा आयपीएस सेवेचा आत्मा आहे. काँग्रेसचा सवाल: संघाच्या मंचावर जाऊन त्यांचे कौतुक करणे ही तटस्थता आहे की एका विशिष्ट प्रवाहाशी निष्ठा व्यक्त करणे? जर उद्या एखादा अधिकारी दुसऱ्या धार्मिक किंवा राजकीय संघटनेच्या मंचावर जाऊन गुणगान करू लागला, तर प्रशासनावर जनतेचा विश्वास कसा टिकेल? 4. संविधान सर्वोच्च की संघ विचार? (Rule 3(2B)(ii)) नियम काय सांगतो: प्रत्येक अधिकाऱ्याला संविधानाच्या सर्वोच्चत्वाशी बांधून ठेवतो. काँग्रेसचा सवाल: भारतीय संविधान सर्व भारतीयांचे आहे. एका संविधानिक अधिकाऱ्याने एका विशिष्ट वैचारिक संघटनेच्या मंचावर जाऊन तिचे सार्वजनिक गौरवगान करणे ही संविधानिक तटस्थता मानली जाऊ शकते का? 5. निर्णयावर प्रभाव पडण्याची शंका (Rule 3(2B)(vi)) नियम काय सांगतो: अधिकाऱ्याला अशा कोणत्याही संघटना किंवा व्यक्तीच्या प्रभावाखाली जाण्यापासून रोखतो ज्यामुळे त्याच्या कर्तव्यांवर परिणाम होऊ शकतो. काँग्रेसचा सवाल: जेव्हा एखादा अधिकारी विशिष्ट विचारधारात्मक मंचावर गौरवोद्गार काढतो, तेव्हा उद्या त्याच्या निर्णयांवर त्या विचारधारेचा प्रभाव पडणार नाही याची खात्री कोण देणार? 6. संघटनेशी संबंध (Rule 5(1) – सर्वात गंभीर प्रश्न) नियम काय सांगतो: सेवेतील कोणताही अधिकारी राजकारणात भाग घेणाऱ्या कोणत्याही संघटनेशी संबंधित (Associated with) असणार नाही. काँग्रेसचा सवाल: संघाच्या मंचावर जाऊन सार्वजनिकरीत्या त्याचे गुणगान करणे ही “Association” (संबंध) मानली जाणार नाही का? वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत का? शेवटी काँग्रेसने सरकारला मौन सोडण्याचे आवाहन करत म्हटले आहे, “सामान्य पोलीस कर्मचारी राजकीय भूमिका घेताना आढळला तर त्याच्यावर कारवाई होते, मग वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांसाठी वेगळे नियम आहेत का? आज प्रश्न विश्वास नांगरे पाटील या व्यक्तीचा नाही, तर प्रशासकीय विश्वासार्हतेचा, खाकी वर्दीच्या प्रतिष्ठेचा आणि संविधानाच्या सर्वोच्चत्वाचा आहे.” या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि संबंधित परवानग्या सार्वजनिक कराव्यात, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. संबंधित बातमी वाचा… ‘वर्दीची शपथ विसरून संघाची स्तुती…’:संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांवर काँग्रेसची टीका
नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त (CP) विश्वास नांगरे पाटील हे त्यांच्या एका कार्यक्रमातील उपस्थितीमुळे आणि विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) एका कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि संस्थापकांची स्तुती केली. यावरून काँग्रेसने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत “ते संविधानाची आणि खाकी वर्दीची शपथ विसरून संघाची चाटुगिरी करत आहेत,” अशी घणाघाती टीका केली आहे. एकीकडे काँग्रेसने नांगरे पाटलांना टार्गेट केले असताना, दुसरीकडे नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र त्यांचे स्वागत करत नागपूरच्या सुधारलेल्या कायदा व सुव्यवस्थेचे कौतुक केले आहे. येथे वाचा सविस्तर बातमी

Leave a Comment

error: Content is protected !!