Shopping Cart
Total:

$0.00

Items:

0

Your cart is empty
Keep Shopping

विलासराव देशमुख महाराष्ट्राचे महत्त्वाचे नेतृत्व:रवींद्र चव्हाणांचे वक्तव्य अनावधानाने, देवेंद्र फडणवीसांकडून लातुरात डॅमेज कंट्रोल

“आमची राजकीय लढाई काँग्रेस पक्षाशी असली, तरी दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबद्दल आमच्या मनात नितांत आदर आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचा मोलाचा वाटा आहे, अशा नेत्यांमध्ये विलासरावांचे नाव प्रमुख आहे, हे सांगताना मला कोणताही संकोच वाटत नाही,” अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरमध्ये भावनिक साद घातली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी विलासरावांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावरून निर्माण झालेला तणाव निवळण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी लातुरात ‘डॅमेज कंट्रोल’ केल्याचे दिसून आले. महाराष्ट्राचे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या आठवणी लातूरमधून पुसल्या जातील, असे वादग्रस्त वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. या वक्तव्यामुळे लातूरसह संपूर्ण मराठवाड्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, काँग्रेस कार्यकर्ते आणि विलासराव देशमुखांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली. मुद्दा अधिक तापण्याची शक्यता पाहता रवींद्र चव्हाण यांची आपल्या विधानावरून दिलगिरी देखील व्यक्त केली. मात्र, रवींद्र चव्हाण यांच्या निषेधार्थ विविध संघटनांच्या वतीने बुधवारी लातूर बंदची हाक देण्यात आली होती. नेमके काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? लातूरमध्ये आयोजित एका सभेत बोलताना फडणवीस यांनी लातूरच्या राजकीय वारशाचा गौरव केला. “लातूर अशी भूमी आहे की जिने महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात नेतृत्व दिले. चाकूर साहेबांचे एकूण राजकीय आयुष्य बघितले, तर नगराध्यक्षपासून ते लोकसभेच्या अध्यक्षापर्यंत आणि महाराष्ट्रातील मंत्रीपदापासून देशाच्या गृहमंत्रीपदापर्यंत त्यांनी कारभार चालवला. राजकारणात अशाप्रकारचे लोक आपल्याला विरळ दिसतात. त्याचप्रमाणे शिवाजीराव पाटील निलंगेकर यांसह लातूरला वेगळी ओळख देणारे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे नाव पक्षाच्या पलिकडे आहे. महाराष्ट्राचा जडणघडणीत मोलाचा वाटा आहे म्हणून आपण ज्या नेत्यांचा आदर करतो, त्यातील प्रमुख नाव विलासराव देशमुख यांचे आहे, असे सांगताना मला कुठलाही संकोच नाही” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. रवींद्र चव्हाणांचे वक्तव्य अनावधानाने रवींद्र चव्हाण यांनी विलासराव देशमुख यांच्याबद्दल केलेल्या विधानावरही स्पष्टीकरण दिले. “दोन दिवसांपूर्वी काही गोंधळ झाला. आमच्या अध्यक्ष बोलत असताना, त्यांना सांगायचे होते की, राजकीयदृष्ट्या आपल्याला नवीन रेकॉर्ड तयार करायचा आहे. पण कदाचित त्यांचे शब्द चुकीच्या पद्धतीने गेले असतील, त्याबाबत त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे. मी जाहीरपणे सांगतो काँग्रेस पक्षाशी आमची लढाई असली, तरी विलासराव देशमुखांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे. ते या महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेतृत्व आहेत”, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी लातुरात डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला. लातूर ज्यांची जन्मभूमी नव्हती, पण त्यांची कर्मभूमी होती, असे आमचे नेते गोपीनाथराव मुंडे यांचेही स्मरण या निमित्ताने लातुरकरांसोबत केले पाहिजे. या भूमिमध्ये नेतृत्व तयार करण्याचा एक गुण आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणालेत. लातूरला पुन्हा रेल्वेने पाणी आणावे लागणार नाही लातूरच्या पाणीप्रश्नावर बोलताना फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आणि भविष्यातील विकासाचा रोडमॅप मांडला. “आज लातुरला रेल्वेने पाणी आणावे लागतंय. या संकटाचे संधीत रुपांतर करायचे आहे. पुढील काळात लातुरमध्ये परत कधीही रेल्वेने पाणी आणावे लागू नये यादृष्टीने काम करायचे आहे. जलयुक्त शिवारपासून पिण्याच्या पाण्याच्या योजनेपर्यंत अनेक योजनांना चालना दिली. लातुरच्या प्रत्येक घरामध्ये नळ उघडल्यानंतर दररोज शुद्ध पिण्याचे पाणी आलंच पाहिजे, त्यादृष्टीने आपण नियोजन केले. मध्यंतरी सरकार गेल्यानंतर आपण केलेले नियोजन बासनात गुंडाळण्यात आले. आता पुन्हा सरकार आल्यानंतर आपण त्याला चालना दिलीये. जवळपास २५९ कोटी रुपयांची योजना आपण लातुरकरिता मंजूर केली. २२ टक्के कामही त्याचे पूर्ण झालेले आहे. महापालिका निवडणुकीनंतर दुसऱ्या टप्प्यालाही मान्यता देणार आहे”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. नेमके काय म्हणाले रवींद्र चव्हाण? लातूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण शहरात प्रचारासाठी आले होते. यावेळी घेतलेल्या सभेत त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना लातूरच्या राजकारणाचा उल्लेख केला. भाषणाच्या ओघात त्यांनी, लातूरमध्ये कार्यकर्त्यांचा जो उत्साह दिसतोय, तो पाहता विलासराव देशमुख यांच्या आठवणी या शहरातून पुसल्या जातील, यात शंका नाही, असे विधान केले. या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले असून, विशेषतः काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.

Read Also:
0
Show Comments (0) Hide Comments (0)
0 0 votes
Article Rating
Subscribe
Notify of
guest
0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
Recent Posts:
error: Content is protected !!