बातमी ऐका (Marathi Voice Reader)
वाशिम | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने लग्नसराईच्या हंगामात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन लागू केलेली तात्पुरती भाडेवाढ तसेच ‘स्वच्छता अधिभारा’च्या नावाखाली आकारण्यात येणारे अतिरिक्त दोन रुपये तात्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांकडून होत आहे. काही महिन्यांपूर्वी लग्नसराईच्या काळात प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे एसटी महामंडळाने तिकिटांच्या दरात वाढ केली होती. तसेच प्रत्येक तिकिटामागे स्वच्छता अधिभार म्हणून अतिरिक्त दोन रुपये आकारण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, लग्नसराईचा हंगाम पूर्णपणे संपल्यानंतरही वाढ कायम ठेवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दैनंदिन प्रवास करणारे विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि नोकरदार वर्गाला या वाढीव दरांचा आर्थिक फटका बसत आहे. महागाईच्या काळात प्रवासखर्च वाढल्याने सर्वसामान्यांचे बजेट कोलमडत असल्याची भावना प्रवाशांनी व्यक्त केली आहे.