अंबरनाथ नगरपरिषदेत सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये पडद्याआड सुरू असलेल्या हालचालींनी नाट्यमय वळण घेतले आहे. स्थानिक पातळीवर भाजपशी हातमिळवणी केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसने ज्या १२ नगरसेवकांचे निलंबन केले, त्याच नगरसेवकांनी आता थेट भाजपात प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांच्या उपस्थितीत नवी मुंबईत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. अंबरनाथमध्ये काँग्रेसचे नेतृत्व करणारे प्रदीप नाना पाटील आणि त्यांच्यासह इतर ११ नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा देण्याचे संकेत दिले होते. याची गंभीर दखल घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी या सर्व नगरसेवकांना पक्षातून निलंबित केले होते. मात्र, काँग्रेसच्या या कारवाईला जुमानता प्रदीप पाटील यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांमध्ये प्रदीप नाना पाटील, दर्शना उमेश पाटील, अर्चना चरण पाटील, हर्षदा पंकज पाटील, तेजस्विनी मिलिंद पाटील, विपुल प्रदीप पाटील, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजीवनी राहुल देवडे, दिनेश गायकवाड, किरण बद्रीनाथ राठोड, कबीर नरेश गायकवाड यांचा समावेश आहे. अंबरनाथच्या नगर परिषदेवर आता भाजपचे वर्चस्व प्रदीप पाटील यांनी अनेक वर्षांपासून अंबरनाथमध्ये काँग्रेसचे संघटन मजबूत ठेवले होते. मात्र, त्यांच्या भाजप प्रवेशामुळे अंबरनाथ नगरपरिषदेत भाजपची ताकद प्रचंड वाढली असून, काँग्रेसचे अस्तित्व संकटात आले आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘काँग्रेससोबत युती करणार नाही’ असे स्पष्ट केले होते, मात्र नगरसेवकांनीच भाजपमध्ये प्रवेश केल्याने तांत्रिकदृष्ट्या हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. भाजप आपल्या नेत्यांवर कारवाई कधी करणार? या घडामोडींवर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.”जर काँग्रेसने आपल्या नगरसेवकांवर शिस्तभंगाची कारवाई केली, तर ज्या भाजप नेत्यांनी या नगरसेवकांना आघाडीचा प्रस्ताव दिला, त्यांच्यावर भाजपने अद्याप कारवाई का केली नाही?” असा सवाल सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत यांनी अकोटमधील भाजप-एमआयएम युतीचा दाखला देत भाजपच्या नीतिमत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अकोटमध्ये भाजपने सत्तेसाठी एमआयएमशी हातमिळवणी केली. यावरून स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदू महासभा आणि मुस्लिम लीगच्या युतीची आठवण होते. भाजप आणि एमआयएम पडद्याआड एकच आहेत, हे आता उघड झाले आहे. सत्तेसाठी तत्त्वे आणि विचार बाजूला ठेवणारा हा पक्ष आहे,” अशी टीका त्यांनी केली.
