शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांच्या भूमिकेवरून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये आता शिंदे गटाकडून मोठा दावा करण्यात आला आहे. शिवसेना MLC चंद्रकांत रघुवंशी यांनी “ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात यशस्वी झाले असून सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त करत शिवसेनेत प्रवेश केला आहे,” असे म्हटले आहे. ‘ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात घडलं’ धुळ्यात माध्यमांशी बोलताना रघुवंशी म्हणाले, “ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात घडलं आहे. आज सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि शिवसेनेत प्रवेश केला.” गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना यामुळे आणखी बळ मिळाले आहे. ‘त्यांचं स्वागत करतो’ या घडामोडीचे स्वागत करत रघुवंशी पुढे म्हणाले, “ते आमच्यासोबत आले, ही चांगली गोष्ट आहे. मी त्यांचे स्वागत करतो.” शिंदे गटाकडून सातत्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारे लोक आपल्या पक्षात येत असल्याचा दावा केला जात आहे. रघुवंशी यांच्या वक्तव्यालाही त्याचाच भाग मानले जात आहे. ठाकरे गटासाठी मोठा धक्का? लोकसभा निवडणुकीत शिवसेना (UBT) ने चांगली कामगिरी केली होती. मात्र, त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत सहा खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या हालचाली करत असल्याच्या बातम्यांमुळे ठाकरे गटासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, या खासदारांनी स्वतंत्र गटाला मान्यता देण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा केवळ राजकीयच नव्हे तर कायदेशीर संघर्षही ठरण्याची शक्यता आहे. आता ठाकरे गटाची भूमिका महत्त्वाची दरम्यान, ठाकरे गटाकडून अद्याप अधिकृतपणे या दाव्यांवर सविस्तर प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. पक्षाचे नेते सातत्याने “ऑपरेशन टायगर”च्या चर्चांना फारसे महत्त्व नसल्याचे सांगत असले तरी, दिल्लीत झालेल्या बैठका आणि खासदारांच्या हालचालींमुळे राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता चंद्रकांत रघुवंशी यांच्या या दाव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सहा खासदारांनी प्रत्यक्षात कोणती भूमिका घेतली, लोकसभा अध्यक्षांचा निर्णय काय होतो आणि पुढील काळात ते शिंदे गटात अधिकृतपणे सामील होतात का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे मेहनत घेतात उमेदवार निवडून आणतात आणि तुम्ही त्यांना फोडतात ही कसली लोकशाही आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी बाहेर देशात जाऊन भाषणं करतात, त्यांनी देशात काय सुरू आहे, याकडे लक्ष दिले पाहिजे. आज बैठकीला आम्ही खासदारांची वाट बघू नाहीतर कारवाईला सुरूवात करणार. जे खासदार फुटतील त्यांनी सुटी देणार नाही. बेईमानी करणाऱ्या लोकांना आता सोडणार नाही, त्यांच्या मतदारसंघात आम्ही सभा घेणार आहोत यासाठी आमच्यासोबत शरद पवार आणि काँग्रेससुद्धा असणार आहेत. कोणी खासदार फुटला तर त्यांना आम्ही धडा शिकवू. येथे वाचा संपूर्ण बातमी
