ठाकरे बंधूंसोबत मराठी माणूस नाही:मुंबईत महायुतीचा विजय निश्चित, मुख्यंमत्र्यांचा विश्वास; ठाकरेंसोबतच्या युतीची शक्यताही फेटाळली

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत महायुतीचा विजय निश्चित असल्याचा पुनरुच्चार केला. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्र हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच मागे उभा असल्याचे अधोरेखित होईल. विशेषतः भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, महायुतीच येथे राज्य करेल व मोदींच्या नेतृत्वात मिळालेल्या या विजयातून महाराष्ट्र कुणासोबत आहे हे ही स्पष्ट होईल, असे ते म्हणालेत. मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांसाठी उद्या मतदान होणार आहे. तत्पूर्वी, आज वृत्तसंस्थेशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली. ते म्हणाले, विरोधकांनी (ठाकरे बंधू) मराठी विरुद्ध अमराठी अशी निवडणूक करण्याचा खूप प्रयत्न केला. पण मराठी माणूस एवढा संकुचित नाही. महाराष्ट्रात आमची प्रादेशिक अस्मिता आहे. मराठी आमची भाषा आहे. त्या भाषेचा आम्हाला अभिमान आहे. त्या भाषेचा विकास व कल्याण झाले पाहिजे. मराठी माणूस हा महाराष्ट्रात सुरक्षित असला पाहिजे. त्याचा विकास झाला पाहिजे. यावर दुमत असता कामा नये. पण मराठी माणसाचा विकास म्हणजे काय? मराठी माणसावर मागील 25 वर्षांत मुंबईतून पलायन करण्याची वेळ आली. आणि तुम्ही तिकडे केवळ वल्गना केल्या, हा मराठी माणसाचा विकास नाही. एखाद्या परप्रांतीय ऑटो चालकाला 2 थापडा मारणे हा ही मराठी माणसाचा विकास नाही. मराठी माणसांचा विकास आम्ही केला ते म्हणाले, आम्ही 80 हजार मराठी माणसांना बीडीडी चाळीत हक्काचे घर देऊन दाखवले. अभ्यूदय नगर असेल, पत्राचाळ असेल, विशाल सह्याद्री असेल, मोतीलाल नगर आदी भागातील मराठी माणूस कदाचित वसई-विरारपेक्षा जास्त लांब राहण्यासाठी गेला असता. त्याला त्याच ठिकाणी घरे देण्याचे काम आम्ही केले. हे मराठी माणसांसाठी केलेले काम आहे. त्यामुळे आज या एकाच कारणाने मराठी माणूसही विरोधकांसोबत नाही व अमराठीही त्यांच्यासोबत नाही. मराठी माणसाला ग्रहित धरून त्यांनी केलेला प्रयत्न पूर्णतः अपयशी ठरला आहे. अन्नामलाईंच्या विधानाचे केले समर्थन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी तामिळनाडूचे भाजप नेते अन्नामलाई यांच्या मुंबईवरील विधानावरून निर्माण झालेल्या वादावरही भाष्य केले. या प्रकरणी त्यांनी अन्नामलाईंचे स्पष्टपणे समर्थन केले. ते म्हणाले, अन्नामलाई हे काही राष्ट्रीय नेते नाहीत. ते बिचारे त्या तामिळनाडूचे नेते आहेत. येथील तामिळ लोकांनी बोलावले म्हणून ते आले. अनेकदा आपल्याही तोंडी मद्रास येते, मद्रासी येते. आता चेन्नई म्हणायला पाहिजे. आता मद्रासी कुणीच नाही. पण आपण बोलतो ना बोलता – बोलता. कारण जुनी सवय आहे. आपला काही त्यांचा अपमान करण्याचा हेतू नसतो. त्यामुळे अन्नामलाई यांनी बोलता – बोलता बॉम्बे म्हटले तर त्याचा अर्थ त्यांनी मुंबईचा अपमान केला किंवा ते मुंबईच्या विरोधात आहेत असा नाही. कोणत्याही गोष्टीचे भांडवल करायचे व त्यानंतर ज्या शब्दांत ते अन्नामलाईला बोलले ते पाहता तो तामिळ लोकांचा अपमान ठरत नाही का? या देशात मराठींनी तमिळांचा अपमान करायचा व हिंदींनी तेलुगुंचा करायचा, अशा पद्धतीने आपल्याला देश चालवायचा आहे का? आपल्या स्वभाषेचा अभिमान आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवला. त्याचवेळी इतर भारतीय भाषांचा सन्मानही आम्हाला शिवाजी महाराजांनीच शिकवला, असे ते म्हणाले. ठाकरेंसोबत युतीची कोणतीही शक्यता नाही निवडणुकीनंतर भाजप उद्धव ठाकरेंशी युती करणार का? असा प्रश्न यावेळी वृत्तसंस्थेने फडणवीसांना विचारला. त्यावर त्यांनी आमहाला कुणाशीही युती करण्याची गरज भासणार नाही असे ठणकावून सांगितले. राजकीय संबंध प्रस्थापित होण्याचे कोणतेही कारण मला दिसत नाही. वैयक्तिक पातळीवर ते आमचे काही शत्रू नाहीत. आम्ही एकत्र बसून चहाही पिऊ शकतो. त्याला कोणतीही अडचण नाही.

Leave a Comment

error: Content is protected !!