बालभारतीने अखेर चूक सुधारली:भिडे वाड्यातील शाळा ‘महाराष्ट्रातील’ नव्हे, तर ‘देशातील’ पहिली मुलींची शाळा; भुजबळांकडून निर्णयाचे स्वागत

महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात सुरू केलेली मुलींची शाळा ही संपूर्ण देशातील पहिली शाळा आहे, हा इतिहास सर्वश्रुत आहे. परंतु, बालभारतीने इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात या शाळेचा उल्लेख ‘महाराष्ट्रातील पहिली शाळा’ असा संकुचित करून ऐतिहासिक चूक केली होती. यावर शिक्षक संघटना आणि नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतल्यानंतर, अखेर बालभारतीने आपली चूक मान्य करत त्यात तातडीने दुरुस्ती केली आहे. पाठ्यपुस्तकातील नेमकी ‘घोडचूक’ काय होती? चालू शैक्षणिक वर्षाच्या (२०२६-२७) इयत्ता तिसरीच्या ‘आपल्या सभोवतालचे जग भाग-२’ या पाठ्यपुस्तकात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या भिडे वाड्यातील शाळेचा उल्लेख करण्यात आला होता. मात्र, तिथे ‘देशातील पहिली मुलींची शाळा’ असे लिहिण्याऐवजी, ‘महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळा’ असा अत्यंत संकुचित आणि मर्यादित उल्लेख करण्यात आला होता. यामुळे महापुरुषांच्या ऐतिहासिक कार्याचे महत्त्व कमी होत असल्याचा आरोप होऊ लागला. प्रहार शिक्षक संघटनेचा आक्षेप आणि मागण्या बालभारतीच्या या चुकीवर ‘प्रहार शिक्षक संघटने’चे राज्याध्यक्ष महेश ठाकरे यांनी सर्वात आधी आक्षेप नोंदवला. त्यांनी बालभारतीच्या संचालिका डॉ. अनुराधा ओक यांना थेट लेखी निवेदन दिले. संघटनेचे म्हणणे होते की, “महाराष्ट्र शासनाचे अधिकृत दस्तऐवज आणि राष्ट्रीय स्मारकांमधील नोंदींमध्ये या शाळेचा उल्लेख ‘देशातील पहिली शाळा’ असाच आहे. बालभारतीसारख्या अग्रगण्य संस्थेकडून अशी चूक होणे खेदजनक असून, यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत चुकीचा इतिहास पोहोचत आहे.” चुकीचा उल्लेख तातडीने बदलून तिथे ‘देशातील पहिली मुलींची शाळा’ अशी दुरुस्ती करावी. विद्यार्थी आणि शिक्षकांचा संभ्रम दूर करण्यासाठी तातडीने अधिकृत शुद्धिपत्रक काढावे. भविष्यात अशा गंभीर चुका टाळण्यासाठी संबंधित समितीला सतर्कतेच्या सूचना द्याव्यात. छगन भुजबळ यांचे लक्षवेधी पाऊल आणि बालभारतीची माघार या प्रकरणाने जोर धरल्यानंतर राज्याचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी या गंभीर ऐतिहासिक त्रुटीकडे लक्ष वेधले. वाढता दबाव आणि ऐतिहासिक पुराव्यांची दखल घेत बालभारतीच्या संचालक डॉ. अनुराधा ओक यांनी अखेर चूक मान्य केली आणि एक अधिकृत शुद्धिपत्रक जारी केले. या शुद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की, ‘भिडे वाड्यात सुरू झालेली शाळा ही महाराष्ट्रातील नव्हे, तर भारतातील पहिली मुलींची शाळा आहे’ आणि पुढील पाठ्यपुस्तकांमध्ये तशी योग्य दुरुस्ती करण्यात येईल. छगन भुजबळांकडून निर्णयाचे स्वागत बालभारतीने चूक सुधारल्याची माहिती मिळताच छगन भुजबळ यांनी ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून या निर्णयाचे स्वागत केले. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणाले, “क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबाबत बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात झालेल्या गंभीर ऐतिहासिक त्रुटीकडे लक्ष वेधल्यानंतर बालभारतीने ती मान्य करत त्याची गंभीर दखल घेत चूक दुरुस्त केली आहे. बालभारतीच्या संचालक अनुराधा ओक यांनी शुद्धीपत्रक काढून भिडे वाड्यात सुरू झालेली शाळा ही भारतातील पहिली मुलींची शाळा असल्याचे स्पष्ट नमूद केले असून तशी दुरुस्ती करण्यात येत असल्याचे सांगितले आहे.” पुढे त्यांनी अपेक्षा व्यक्त करत म्हटले की, “महापुरुषांच्या कार्याचा इतिहास अचूकपणे पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. सत्य इतिहासाच्या जतनासाठी यापुढेही महापुरुषांच्या कार्याची माहिती जशाच्या तशीच पुढच्या पिढीपर्यंत पोहोचेल याची खबरदारी घ्यावी.”

Leave a Comment

error: Content is protected !!