मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या राज्यातील सर्वात हायव्होल्टेज राजकीय लढतीत आता आरोप-प्रत्यारोप अधिकच तीव्र झाले आहेत. दुबार मतदार, बोगस मतदान आणि बूथवरील बंदोबस्त या मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ठेचून काढू या वक्तव्याने वातावरण आणखी तापलं आहे. या वक्तव्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट प्रत्युत्तर देत, मुख्यमंत्री आणि भाजपवर गर्भित इशारा दिला आहे. आम्ही मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी रस्त्यावर आहोत, असं ठणकावून सांगत राऊत यांनी सोशल मीडियावरून आक्रमक भूमिका मांडली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत दुबार किंवा बोगस मतदान होऊ नये, यासाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून प्रत्येक बूथसमोर ‘भगवा गार्ड’ नेमण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. या भगवा गार्डच्या उपस्थितीवर भाजपकडून टीका होत असतानाच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांना ठेचून काढलं जाईल. मुख्यमंत्री म्हणाले की, दुबार मतदार शोधण्याचं काम निवडणूक आयोगाचं असून, बूथवर बसलेले अधिकृत एजंट यासाठी आहेत. मारामारी करून किंवा दहशत निर्माण करून मतदान कमी करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास पोलिस कारवाई करतील आणि मुंबईत अशा प्रकारची दहशत खपवून घेतली जाणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर संजय राऊत यांनी तीव्र प्रतिक्रिया देत थेट ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिलं. त्यांनी म्हटलं की, दुबार किंवा बोगस मतदार पकडण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्यांना ठेचून काढू, असं मुख्यमंत्री म्हणत आहेत. शिवसेना आणि मनसेच्या भगवा गार्डवर त्यांचा रोख दिसतो आहे. मात्र, मुख्यमंत्री साहेब, हरामच्या पैसा वाटपावरून सध्या ‘शहा सेनेचे’ लोक भाजपच्या लोकांना ठेचताना दिसत आहेत, त्याकडे लक्ष द्या, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला. तसेच, आम्ही मुंबई आणि मराठीच्या रक्षणासाठी रस्त्यावर आहोत, एवढंच सध्या सांगतो, असं म्हणत त्यांनी जय महाराष्ट्रचा नारा दिला. राऊत यांच्या या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. ‘शहा सेनेचे’ लोक भाजपच्या लोकांना ठेचत असल्याचा आरोप करत त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांवर बोट ठेवलं आहे. पैशांच्या वाटपावरून अंतर्गत वाद आणि संघर्ष सुरू असल्याचा सूचक इशाराही या वक्तव्यातून दिला जात असल्याची चर्चा राजकीय जाणकारांमध्ये रंगली आहे. मुंबई आणि मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी आपण रस्त्यावर उतरलो आहोत, हे सांगून राऊत यांनी ठाकरे गटाची भूमिका अधिक आक्रमक केली आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवा गार्डवर टीका करताना अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यांनी म्हटलं की, ही तथाकथित ब्रिगेड काही बूथसमोर दिसत नाही. मालवणीसारख्या भागात ती का दिसली नाही, असे अनेक बूथ आहेत जिथे त्यांची उपस्थिती नाही. मग ही सिलेक्टिव्ह दहशत आहे का, असा सवाल त्यांनी केला. यांची दहशत निर्माण करण्याची क्षमता आता राहिलेली नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर पोलिस ठोकून काढतील, आणि मुंबईत कोणत्याही प्रकारची दहशत सहन केली जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, दुबार मतदार कोण आहेत, हे शोधण्याचं काम निवडणूक आयोगाचं आहे. बूथवर बसलेले अधिकृत एजंट यासाठीच नेमलेले असतात. एखादा दुबार मतदार आढळल्यास एजंटांनी तक्रार घ्यावी आणि कायदेशीर प्रक्रियेनुसार कारवाई व्हावी. मात्र, मारामारी करून मतदान थांबवण्याचा किंवा लोकांना घाबरवण्याचा प्रयत्न केला जात असेल, तर तो लोकशाहीविरोधी आहे. मतदानाची टक्केवारी कमी व्हावी, यासाठी काही जण जाणीवपूर्वक गोंधळ घालतात, असा आरोपही फडणवीस यांनी केला. आरोप-प्रत्यारोपांचा मतदारांवर नेमका काय परिणाम होतो मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकीकडे दुबार मतदारांचा मुद्दा, तर दुसरीकडे मराठी अस्मिता आणि शहराच्या रक्षणाचा नारा, यामुळे राजकारण अधिक धारदार झालं आहे. फडणवीस यांच्या ठेचून काढू या इशाऱ्यानंतर राऊत यांचं प्रत्युत्तर म्हणजे सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्षाचा नवा टप्पा असल्याचं चित्र आहे. निवडणूक प्रक्रियेत शांतता राखण्याची जबाबदारी प्रशासनाची असतानाच, राजकीय नेत्यांच्या या आक्रमक वक्तव्यांमुळे वातावरण अधिक तणावपूर्ण होत असल्याचं स्पष्ट दिसत आहे. आता या आरोप-प्रत्यारोपांचा मतदारांवर नेमका काय परिणाम होतो, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.
